पूरग्रस्त नागरिकांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दिलासा

कोल्हापूर शहरातील पंचगंगा हॉस्पिटल ते शिवाजी पूल रस्ता पूरबाधित भागाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

कोल्हापूर,३० जुलै /प्रतिनिधी :- पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे राहील असा दिलासा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोल्हापूर शहरातील पंचगंगा हॉस्पिटल ते शिवाजी पूल रस्ता पूरबाधित भागाची पाहणी करताना नागरिकांना दिला.

यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्यासमवेत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, मुख्य सचिव सीताराम कुंटे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे आदी उपस्थित होते.

पूरबाधित भाग पाहणीप्रसंगी पंचगंगा हॉस्पिटल परिसरातील पूरग्रस्त नागरिकांना मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात धान्य वाटप करण्यात आले.

मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतल्या कोल्हापुरातील पूरग्रस्तांच्या व्यथा 

मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतल्या कोल्हापुरातील पूरग्रस्तांच्या व्यथा 

नागरिकांनो! घाबरू नका, काळजी करू नका. सध्या आपण कोरोनाशी लढतो आहोत. संयम बाळगा. येथील लोकप्रतिनिधींशी चर्चा करून कुंभारगल्ली व परिसरातील पूरस्थितीवर मार्ग काढू. अशा आश्वस्त शब्दात मुख्यमंत्र्यांनी शाहुपुरी ६ व्या गल्लीतील पूरबाधित राहिवाशांशी अत्यंत आत्मियतेने संवाद साधला. पुरामुळे बाधित झालेल्या स्थितीची पाहणी करण्यासाठी ते आज कोल्हापुरात आले होते.

आपत्कालीन स्थितीत पालकमंत्री सतेज पाटील यांनी खूप आधार दिल्याचे सांगून, २००५ व २०१९ पेक्षाही यावर्षीचा पूर भयंकर असून शासनाने आम्हाला भरीव मदत करावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली .

याप्रसंगी पालकमंत्री सतेज पाटील , ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, खा . संजय मंडलिक , खा.धैर्यशील माने, आ.जयंत आसगावकर, आ. ऋतूराज पाटील, मुख्य सचिव सीताराम कुंटे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार ,मनपा आयुक्त डॉ . कादंबरी बलकवडे आदी उपस्थित होते.