अधिकाधिक लोकांचे लसीकरण झाल्यास तिसऱ्या लाटेचा धोका कमी होईल – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

कोरोना काळात सेवा देणाऱ्या ॲम्ब्युलन्स चालकांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार

मुंबई,६जुलै /प्रतिनिधी :- कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत देशातील व राज्यातील लोकांनी अनेक समस्यांचा सामना केला. या कठीण प्रसंगीदेखील कोरोना योद्ध्यांनी जीवाची पर्वा न करता देवदूतांप्रमाणे काम केले. देशात कोरोना रुग्णांचे प्रमाण सातत्याने घटत आहे. लवकरात लवकर सर्वांचे लसीकरण झाल्यास कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका कमी होईल, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

कोरोना उद्रेकानंतर शाळा व कंपनीच्या बसेस व वाहने गरजू रुग्णांच्या सेवेकरिता ॲम्ब्युलन्स सेवा म्हणून वापरल्याबद्दल राज्यपालांच्या हस्ते मुंबईतील 50 ॲम्ब्युलन्स चालक, व्यवस्थापक, स्कूल बस मालक व स्कूल व कंपनी बस चालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा राजभवन येथे सत्कार करण्यात आला.

स्कूल अँड कंपनी बस ओनर्स असोसिएशनतर्फे कोरोना योद्ध्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला संघटनेचे अध्यक्ष अनिल गर्ग, सचिव दीपक नाईक व महासचिव रमेश मणियन प्रामुख्याने उपस्थित होते.

कोणत्याही श्रमिकांचे काम गौण नसून ते महत्त्वाचे आहे, असे सांगून राज्यपालांनी वाहनचालकांना कौतुकाची थाप दिली.