मोदी सरकारच्या सातव्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपाचे गावोगावी कोरोनासंबंधी सेवाकार्य

जिल्हाध्यक्ष विजय औताडे यांची माहिती

औरंगाबाद,२९ मे /प्रतिनिधी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टी आघाडीच्या केंद्र सरकारला दि. ३० मे रोजी सात वर्षे पूर्ण होत असून त्या दिवशी भाजपा औरंगाबाद जिल्ह्यामधील ९५० गावांमध्ये कोरोनासंबधी सेवाकार्य करणार आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष विजय औताडे यांनी दिली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे निर्माण झालेली स्थिती ध्यानात घेता कोणताही उत्सव होणार नाही, असेही ते म्हणाले.
   जिल्हाध्यक्ष विजय औताडे यांनी सांगितले की, औरंगाबाद जिल्ह्यातील ९५० गावांमध्ये दि. ३० मे रोजी भाजपाचे कार्यकर्ते भेट देतील. त्या गावांमधील आशा सेविका आणि कोरोनाच्या साथीचा सामना करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा पक्षातर्फे सत्कार करण्यात येईल. गावामध्ये भाजपाचे कार्यकर्ते कोरोनासंबंधी सेवाकार्य करतील. त्यामध्ये मास्क वाटप, सॉनिटायझर वाटप,रक्तदान शिबीर, कोव्हीड सेंटर मध्ये भोजन पॉकेट वाटप, रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी औषधी वाटप, दिव्यांगाना लसीकरणास मदत, स्वच्छता अभियान, तसेच फवारणी  यांचा समावेश असेल.
      ते म्हणाले की, जिल्ह्यातील भाजपाचे सर्व खासदार, आमदार, नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी यांच्यासह सर्व कार्यकर्ते सेवाकार्यात सहभागी होतील. पक्षातर्फे कोरोनाच्या संकटात सातत्याने सेवाकार्य चालू आहे. पक्षातर्फे ३० मे चा दिवसही विशेष सेवाकार्य करून साजरा करण्यात येणार आहे. कोरोनासंबंधी सर्व नियमांचे पालन करून आणि प्रशासनाला सहकार्य करून हा उपक्रम होईल.
      त्यांनी सांगितले की, भाजपाच्या युवा मोर्चा, महिला मोर्चा, किसान मोर्चा अशा सर्व मोर्चांचे कार्यकर्ते दि. ३० रोजी रक्तदान शिबीरांचे आयोजन करणार आहेत. तसेच जिल्ह्यातील फुलंब्री, पैठण, सिल्लोड, गंगापूर, वैजापूर, खुलताबाद, सोयगाव, कन्नड, करमाड, वाळूज  या शहरांमध्ये सेवावस्त्यांमध्ये विशेष सेवाकार्य करण्यात येईल.
    ते म्हणाले की, मोदी सरकारला सात वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल नुकतीच पक्षाची राज्यस्तरीय ऑनलाईन बैठक झाली. त्या बैठकीत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी मार्गदर्शन केले. त्यानुसार यंदा मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त विशेष सेवाकार्य करण्यात येईल.