सततच्या लाॕकडाऊनला वैतागून ट्रक ड्रायव्हरची विहिरीत उडी मारून आत्महत्या
कुटुंबावर आली होती उपासमारीची वेळ
निलंगा,२२मे /प्रतिनिधी :-
सततच्या लाॕकडाऊनला वैतागून आपल्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे म्हणत एका विवाहित ट्रक ड्रायव्हरने गावातील मुख्य चौकातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना निलंगा तालुक्यातील अंबुलगा (बु) येथे घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की निलंगा तालुक्यातील अंबुलगा बु) येथील खंडू तात्येराव डोंगरे वय ३२ वर्षे या विवाहित तरूण ट्रक ड्रायव्हरने संपूर्ण कुटुंबावर उपासमारीची वेळ आली म्हणून विहिरीत उडी घेऊन आपले जीवन संपविले आहे.या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
गेल्या चौदा महिण्यापासून कोरोनासारख्या संसर्गजन्य रोगामुळे राज्यसह देशात रूग्ण संख्येत वाढ होऊ नये म्हणून लाॕकडाऊन करण्यात आले सर्वसामान्य हातावर पोट असणाऱ्या लोकांना आपले कुटुंब जगवावे कसे हा मोठा प्रश्न आ वासून समोर उभा होता.गेल्या एका वर्षापासून कामधंदा नसल्यामुळे व ट्रकमालकाची गाडी बसून असल्याने सदरील ट्रकमालकाने गाडीवरून काढून टाकले होते.म्हणून या गोष्टीला व्यक्तीने वैतागून व कुटुंबावर उपासमारीची वेळ आली म्हणून गावातील विहिरीत उडी मारून पाण्यात बुडून आत्महत्या केल्याची घटना घडली असून औराद शा.पोलिस ठाण्याचे पोलिस व गावकरी यांनी विहिरीतील प्रेत तब्बल सोळा तासानंतर गळाच्या सहाय्याने बाहेर काढले.व गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ श्रीधर रोडे यानी उत्तरीय तपासणी करून प्रेत अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आले आहे.सदरील आत्महत्याग्रस्त तरूणावर दिनांक २२ रोजी अंतिमसंस्कार करण्यात आले आहे.औराद शा.पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सहा महिण्याच्या मुलीच्या -हदयाला छिद्र असल्यामुळे ती आजारी होती गरीबी परिस्थितीमुळे दवाखाने करणेही अवघड झाले होते.लाॕकडाऊन पडल्याने ट्रक मालकाने गाडीवरून काढून टाकल्यामुळे घर चालवणे व मुलीचा दवाखाना करणे या सर्व गोष्टीला वैतागून या तरूण विवाहित खंडूने आपला जीव दिला आहे असे त्याचे वडील तात्येराव डोंगरे यानी सांगितले.