गडचिरोलीतील कोटमी परिसरात पोलीस नक्षल चकमकीत १३ नक्षलवाद्यांना कंठस्नान

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गडचिरोली पोलीस दलाचे केले कौतुक

गडचिरोली ,२१ मे /प्रतिनिधी:- 

जिल्ह्यातील उपविभाग एटापल्ली अंतर्गत येणारे पोलीस मदत केंद्र कोटमी हद्दीत मौजा पैडी जंगल परीसरात पोलीस व नक्षलवादी चकमकीत 13 जहाल नक्षलवाद्यांना मारण्यात पोलीस विभागाला यश आले. गडचिरोली दौऱ्यावर असलेले गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन गडचिरोली पोलीस दलाचे कौतुक केले. यावेळी वळसे पाटील म्हणाले की, महाराष्ट्रातील गडचिरोली जवळील छत्तीसगड सीमेवरील नक्षलवादासंबंधी आपले मुख्यमंत्री यांचेशी चर्चा करून त्या राज्यातील मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करून सीमाभागात नक्षल प्रतिबंधात्मक विविध उपाययोजना राबविण्याबाबत चर्चा करणार आहे.

दरवर्षी प्रमाणे तेंदुपत्ता हंगामाच्या पार्श्वभूमीवर खंडणी वसूल करण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात नक्षलवादी एकत्र येतात. त्यामुळे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) मनीष कलवानीया, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेरन, अपर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, तसचे उपविभागीय पोलीस अधिकारी (अभियान) भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली मौजा पैडी जंगल परिसरात गडचिरोली पोलीस दलातील सी-६० चे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना आज रोजी सकाळी ६:०० ते ७:३० वाजताच्या सुमारास जंगलात दबा धरून बसलेल्या ६० ते ७० नक्षलवाद्यांनी सी- ६० जवानांना जीवे ठार मारण्याच्या व हत्यार लुटण्याच्या उद्देशाने जवानांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला. त्यावेळी पोलीसांनी नक्षलवाद्यांना त्यांच्या हातातील शस्त्र खाली ठेवून शरण येणे बाबत आव्हान केले असता नक्षलवाद्यांनी शरण न येता पोलीसांवर आननी जोरदार हल्ला चढवला. सी-६० जवानानी प्रत्युत्तरादाखल व स्वरक्षणासाठी नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. यावेळी दिड तास चाललेल्या या चकमकीत नक्षलवाद्यांनी पोलीसांचा वाढता दबाव पाहून घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. चकमकीनंतर सदर जंगल परिसरात सी-६० जवानांनी शोध अभियान राबविले असतांना घटनास्थळी ०६ पुरुष नक्षलवादी, ७ महिला असे एकूण १३ नक्षलवाद्यांचे मृतदेह मिळून आले असल्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी माहिती दिली.

मृतक नक्षलवाद्यांची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. तसेच यात एके ४७, एसएलआर, कारबॉईन, ३०३, १२ बोअर इत्यादी रायफल, भरपूर प्रमाणात स्फोटके मिळून आले. तसेच नक्षलवाद्यांच्या दैनंदिनी जीवनात वापरात येणारे साहित्य मिळाले. सी-६० कमांडोच्या या शौर्यपूर्ण कामगिरीचे दिलीप वळसे पाटील, गृह मंत्री महाराष्ट्र राज्य, मुंबई, यांनी कौतुक केले. सदर भेटीवेळी संजय सक्सेना (भा.पो.से.) अपर पोलीस महासंचालक, विशेष अभियान, महाराष्ट्र राज्य मुंबई, गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उप-महानिरीक्षक संदिप पाटील, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) मनीष कलवानीया, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे उपस्थित होते.

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे कडून चकमकीत सामील जवानांचे अभिनंदन

गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात कोटमी गावाच्या आउटपोस्टच्या हद्दीमध्ये झालेल्या पोलीस सी-60 जवानासोबत झालेल्या चकमकीत 13 जहाल नक्षलवाद्यांना ज्यांच्यावर शासनाने मोठे बक्षिस जाहीर केलेले होते त्यांना कंठस्नान घालण्यात सी 60 जवानांना यश मिळाले असून मी डिआयजी संदिप पाटील, एसपी अंकित गोयल, तसेच अतिरिक्त एसपी व सी-60 तील जवान व पोलीस यांचे मनापासून अभिनंदन करतो असे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज गौरवोद्गार काढले. तसेच गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यासाठी पोलीसांनी कंबर कसली असून त्याचाच हा एक भाग म्हणून आज पहाटे 13 नक्षलवाद्यांचा सी -60 जवानांकडून खात्मा करण्यात आला आहे. मी पुन्हा एकदा या चकमकीत शामील असलेल्या सर्व जवानांचे मनापासून अभिनंदन करतो, असे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गौरवोद्गारे काढले.