खासदार इम्तियाज जलील यांच्या यशस्वी मध्यस्थीने 4784 हेक्टर वरील पिकांना मिळाले पाणी
टेंभापुरी धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकरी बांधवांना मिळाले उन्हाळी हंगामातील आवर्तन
शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण
औरंगाबाद ,१५ मे /प्रतिनिधी :- खासदार इम्तियाज जलील यांनी टेंभापूरी मध्यम प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकरी बांधवांसाठी पाणी सोडण्याचे व पोटचाऱ्या तसेच कालव्याची त्वरित दुरुस्ती व डागडुजी करण्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना पत्राद्वारे सूचित केले होते. सदरील सूचनांची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी यानी टेंभापूरी मध्यम प्रकल्पातून उन्हाळी हंगामातील आवर्तन सोडण्यास परवानगी देवून संबंधित विभागाला पोटचाऱ्या तसेच कालव्याची त्वरित दुरुस्ती व डागडुजी करण्याचे आदेश दिले.
औरंगाबाद जिल्ह्याचे खासदार इम्तियाज जलील यानी गंगापूर तालुक्यातील टेंभापूरी मध्यम प्रकल्पाच्या दोन्ही बाजूच्या शेतकरी बांधवांचे म्हणणे ऐकून दोन्ही बाजुच्या शेतकरी बांधवांचे नुकसान होणार नाही याची दक्षता घेवुन टेंभापुरी धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकरी बांधवाच्या उभ्या पिकांना तात्काळ पाणी सोडण्यात यावे तसेच टेंभापुरी प्रकल्पांतर्गत पोटचाऱ्या व कालव्याची प्रचंड दुरावस्था झाल्याने पाण्याची नासाडी होत होती. म्हणून टेंभापुरी प्रकल्पांतर्गत पोटचाऱ्या व कालव्याची त्वरीत दुरुस्ती व डागडुजी करण्याचे संबंधित विभाग व अधिकाऱ्यांना आदेश निर्गमित करण्यात यावे जेणेकरुन भविष्यात कोणत्याही शेतकरी बांधवाला पाण्याची अडचण निर्माण होणार नाही अशा आशयाचे पत्र दोन दिवसापूर्वी जिल्हाधिकारी यांना दिले होते.
खासदार यांच्या पत्राची दखल घेत आज सकाळी आठ वाजता कार्यकारी अभियंता नांदूर मध्यमेश्वर पाटबंधारे विभाग अभियंता राजन खोपर्ड, कालवा निरिक्षक सोमीनाथ खैरे, अनिल मस्के, सोनवणे, वाघ, मोरे व पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीमध्ये उन्हाळी हंगामातील आवर्तन सोडण्यात आले.
खासदार इम्तियाज जलील यांच्या मुळे 23 गावातील शेतकरी बांधवांच्या 4784 हेक्टर वरील पिकांना टेंभापुरी मध्यम प्रकल्पातून पाणी मिळाल्याने शेतकरी बांधवांत उत्साहाचे वातावरण पसरले असून, समस्त गावकरी व शेतकरी बांधवांनी खासदार इम्तियाज जलील यांचे आभार मानले.