कर्मचाऱ्यांसाठी आरटीपीसीआर चाचणीबरोबरच ॲन्टीजन चाचणीचाही पर्याय

मुंबई, दि. 9 :- राज्य शासनाने कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्याच्या उद्देशाने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य केली होती. आता त्याबरोबरच शनिवार दि. 10 एप्रिलपासून ॲन्टीजन चाचणीही ग्राह्य धरण्यात येईल.

आपत्ती व्यवस्थापन, मदत तथा पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम कुमार गुप्ता यांनी नवीन सुधारणांचे आदेश काढले आहे.

या आदेशानुसार, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नाईलाजास्तव राज्य शासनाला ‘ब्रेक द चेन’ घोषित करून काही निर्बंध लावावे लागले. यामध्ये कोरोना लस न घेणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आरटीपीसीआर चाचणी करणे अनिवार्य करण्यात आले. तसेच त्याची वैधता पंधरा दिवस ठरविण्यात आली. आता यात सुधारणा करण्यात आली असून दि. 10 एप्रिलपासून आरटीपीसीआर चाचणीला पर्याय म्हणून रॅपिड टेस्ट चाचणी ग्राह्य धरण्यात येईल.