‘स्वर्णिम विजय मशाल’चे छावणीत भव्य स्वागत
औरंगाबाद, दिनांक 28 : भारत पाक युद्धाच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त 16 डिसेंबर 2020 रोजी भारतीय सैनिकांच्या अभूतपूर्व बलिदानाचे प्रतीक असलेल्या स्वर्णिम विजय मशालीचे राष्ट्रीय युद्ध स्मारक नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रज्वलन करण्यात आले.
अग्नीबाज डिविजनचे जनरल ऑफिसर कमांडिंग मेजर जनरल अनूप जाखड व औरंगाबाद छावणीचे अन्य अधिकाऱ्यांद्वारा या स्वर्णिम विजय मशालीचे भव्य व भावपूर्ण स्वागत आज छावणीत करण्यात आले.
यावेळी 1971च्या युद्धातील वीर आणि वीर पत्नी यांचा सन्मान करण्यात आला. तसेच महावीर चक्र विजेते मेजर जनरल अनंत नातू यांच्या निवासस्थानी मशाल नेण्यात आली.
29 जानेवारी 2021 रोजी अहमदनगर येथे मशाल पोहोचणार आहे. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, मनपा आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांची उपस्थिती होती.