पंतप्रधानांनी शेतकऱ्यांची केली प्रशंसा
नवी दिल्ली, 27 सप्टेंबर 2020
आपल्या “मन की बात” या भाषणात पंतप्रधान म्हणाले, की कोविड च्या कठीण काळात देशातील शेतकऱ्यांनी प्रचंड प्रतिकारक्षमता दाखवली.
पंतप्रधान म्हणाले की, जर कृषीक्षेत्र मजबूत असले तर आत्मनिर्भर भारताचा पाया भक्कम राहील.नजीकच्या काळात या क्षेत्रावरील अनेक निर्बंध मुक्त करण्यात आले असल्याचे आणि मिथकांना छेद देण्यात आला असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. हरीयाणातील श्री. कन्वर चव्हाण यांचे उदाहरण देत पंतप्रधानांनी सांगितले, की चव्हाण यांना आपली फळे आणि भाजीपाला मंडईच्या बाहेर विकण्यात अनेक अडचणी येत होत्या, परंतु 2014मधे कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यातून फळे आणि भाजीपाला यांना वगळण्यात आले, याचा चव्हाण यांना खूप फायदा झाला. त्यांनी शेतकऱ्यांच्या उत्पादनांची संस्था(Farmer Producer’s Organization) स्थापन केली आणि आता त्यांच्या गावातील शेतकरी मका आणि त्याच्या विविध प्रकारांची लागवड करतात (स्वीट काँर्न आणि बेबी काँर्न) आणि ते उत्पन्न दिल्लीतील आझादपूर मंडईत,मोठ्या किरकोळ साखळी दुकानांत आणि पंचतारांकित हॉटेल्समधून थेट पुरवितात, त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात (कमाईत)कमालीची वाढ झाली आहे.शेतकऱ्यांना आपली फळे आणि भाजीपाला याची विक्री कुणालाही कुठेही करण्याची मुभा आहे, आणि तो त्यांच्या प्रगतीचा पाया आहे, तसेच हे तत्त्व देशभरातील सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या सर्व प्रकारच्या उत्पादनांसाठी प्रभावित करत आहे,असे पंतप्रधानांनी आपल्या भाषणात अधोरेखीत केले.
पंतप्रधानांनी श्री.स्वामी समर्थ फार्म प्रोड्यूस कंपनी लिमिटेड या महाराष्ट्रातील कृषी उत्पादन संघटनेचे(फार्म प्रोड्यूसर्स आँरगनायझेशन) उदाहरण देत सांगितले ,की शेतकऱ्यांना त्यांची फळे आणि भाजीपाला विकण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती पासून परीदृश्य केले आहे.पुणे आणि मुंबई येथील शेतकरी आठवडी बाजार स्वतः चालवीत असून मध्यस्थांशिवाय आपल्या मालाची थेट विक्री करत आहेत,असे त्यांनी नमूद केले.
तामिळनाडू येथील एका केळ्याच्या कृषी उत्पादन संस्थे बद्दल सांगताना पंतप्रधान म्हणाले, की शेतकऱ्यांच्या एक समूहाने टाळेबंदीच्या काळात जवळपासच्या गावांतून शेकडो टन भाजीपाला, फळे आणि केळी विकत घेतली आणि त्यांना एकत्र बांधून ती कोम्बो कीट चेन्नईत विकली .त्यांनी लखनौतील ‘इरादा शेतकरी उत्पादक समूह बाबत उल्लेख केला. पंतप्रधान म्हणाले की, या समूहाने, टाळेबंदीच्या काळात थेट शेतकऱ्यांच्या शेतातील फळे आणि भाजीपाला घेऊन मध्यस्थांशिवाय लखनौच्या बाजारात विक्री केली.
नवनिर्माण आणि नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून कृषी क्षेत्र अधिक प्रगती करेल,असे पंतप्रधानांनी निदर्शनास आणून दिले. ईस्माईल भाई यांनी घरच्यांचा विरोध पत्करून शेती व्यवसाय स्विकारणाऱ्या गुजरातमधील शेतकऱ्याचे उदाहरणही पंतप्रधानांनी दिले. ईस्माईल भाईंनी ठिबक सिंचन तंत्रज्ञानाचा उपयोग करून बटाट्याची लागवड केली आणि आणि उत्तम दर्जाचे बटाटे हा त्यांचा हाँलमार्क बनला असून ते देखील आता मध्यस्थांशिवाय आपल्या मालाची थेट विक्री करून उत्तम लाभ मिळवत आहेत. मणिपूरमधील श्रीमती बिजय शांती या महिलेने कमळाच्या देठापासून धागा तयार केल्याच्या स्टार्ट अप कंपनीच्या प्रयत्नांचे कौतुक करत या नाविन्यपूर्ण कल्पकतेने कमळाची लागवड आणि वस्त्रोद्योग या क्षेत्रात नवीन वाटा उघडल्या गेल्या असल्याच्या कथेची सर्वांना माहिती दिली.
पंतप्रधानांकडून गोष्टी सांगण्याचे महत्त्व अधोरेखित
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच झालेल्या मन की बात कार्यक्रमात गोष्टी सांगण्याबाबत चर्चा केली आणि याचे महत्त्व अधोरेखित केले. गोष्टींचा इतिहास हा मानवी संस्कृती इतकाच प्राचीन असल्याचे त्यांनी नमूद केले आणि जिथे आत्मा आहे तिथे कथा आहे, असे सांगितले. घरातील ज्येष्ठ सदस्यांकडून गोष्टी सांगण्याच्या परंपरेचे महत्त्व त्यांनी समजावून सांगितले. प्रवासादरम्यान अनेक बालकांशी संवाद साधायची संधी मिळाल्यावर त्यांना असे दिसून आले की या बालकांचे आयुष्य विनोदांनी खूप मोठ्या प्रमाणावर व्यापून टाकले होते मात्र, त्यांना गोष्टी या प्रकारांची फारशी माहिती नव्हती. देशातील गोष्टी सांगण्याची किंवा किस्सागोई अर्थात किस्से कथन करण्याच्या समृद्ध परंपरेबाबत पंतप्रधानांनी सांगितले की भारताने हितोपदेश आणि पंचतंत्राच्या परंपरेचे संवर्धन केले आहे, ज्या गोष्टी प्राणी, पक्षी आणि पऱ्यांच्या काल्पनिक विश्वातून ज्ञान देण्याचे काम करत असतात. कथा या धार्मिक गोष्टी सांगण्याच्या प्राचीन प्रकाराचा त्यांनी तमिळनाडू आणि केरळमधील गोष्ट आणि संगीत यांचे मिश्रण असलेल्या विल्लू पाटचे उदाहरण देत उल्लेख केला आणि कठपुतली या अतिशय सचेतनभाव असलेल्या पंरपरेबाबत सांगितले. विज्ञान आणि काल्पनिक विज्ञान यावर आधारित कथाकथनाची लोकप्रियता वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले. गाथास्टोरी डॉट इन सह किस्सागोई या कला प्रकाराला चालना देणाऱ्या विविध उपक्रमांची त्यांनी प्रशंसा केली. आयआयएमचे माजी विद्यार्थी अमर व्यास चालवत असलेले गाथास्टोरी डॉट इन, वैशाली व्यवहारे देशपांडे यांनी मराठीतून सुरू केलेला उपक्रम, चेन्नईच्या श्रीविद्या वीर राघवन यांच्याकडून आपल्या संस्कृतीशी संबंधित गोष्टींना लोकप्रिय करण्यासाठी आणि त्यांचा प्रसार करण्यासाठी होणारे प्रयत्न, गीता रामानुजन यांचा कथालय डॉट ओआरजी हा उपक्रम, इंडियन स्टोरी टेलिंग नेटवर्क आणि बंगळूरुमध्ये महात्मा गांधी यांच्याशी संबंधित असलेल्या कथांबाबत जिव्हाळा असलेल्या विक्रम श्रीधर यांच्याकडून सुरू असलेले प्रयत्न यांची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. पंतप्रधानांनी अपर्णा अत्रेय आणि बंगळूरु स्टोरी टेलिंग सोसायटीच्या इतर सदस्यांशी यावेळी संवाद साधला. या समूहाने यावेळी राजा कृष्णदेव राय आणि त्यांचे मंत्री तेनाली राम यांची एक गोष्ट देखील या संवादादरम्यान सांगितली. महापुरुष आणि महान स्त्री व्यक्तिमत्वांच्या आयुष्याचा प्रभाव त्यांच्या कथांच्या माध्यमातून नव्या पिढीवर निर्माण करण्यासाठी उपाय शोधण्याचे आवाहन त्यांनी गोष्टी सांगणाऱ्यांना केले. कथाकथनाची कला प्रत्येक घरात लोकप्रिय झाली पाहिजे आणि मुलांना चांगल्या गोष्टी सांगणे हा सार्वजनिक जीवनाचा एक भाग बनला पाहिजे, असे ते म्हणाले. कुटुंबातील सदस्यांनी दर आठवड्याला करुणा, संवेदनशीलता, शौर्य, त्याग, धाडस इत्यादींसारखे विषय निवडले पाहिजेत आणि प्रत्येक सदस्याने त्या विषयावर एक गोष्ट सांगितली पाहिजे.
आपला देश लवकरच आपल्या स्वातंत्र्यप्राप्तीचे 75वे वर्ष साजरे करणार आहे असे त्यांनी सांगितले आणि कथाकथनकारांनी आपल्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रेरणादायी घटनांची माहिती गोष्टींच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन केले. 1857 ते 1947 पासून घडलेल्या प्रत्येक मोठ्या आणि लहान घटनांची माहिती गोष्टींच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत पोहोचवावी, असे त्यांनी सुचवले.
महाराष्ट्राला चार वर्षांपूर्वी एपीएमसी कायद्याच्या परिघातून मुक्त करण्यात आले, त्याचे चांगले परिणाम दिसत आहेत: पंतप्रधान नरेंद्र मोदी
ज्याची मुळे जमिनीशी जोडलेली असतात तो मोठ्या वादळामध्ये सुद्धा ठामपणे उभा राहू शकतो आणि कोरोनाच्या काळामध्ये ठामपणे उभे राहिलेले आपले कृषी क्षेत्र याचे उत्तम उदाहरण आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात कार्यक्रमामध्ये बोलताना म्हटले. ते पुढे म्हणाले की देशाचे कृषी क्षेत्र आपले शेतकरी हे आत्मनिर्भर भारताचा आधार असून ते मजबूत असले तरच भारताचा पाया मजबूत होईल. कृषी क्षेत्र कशाप्रकारे नवीन शिखरे गाठत आहे याचे उदाहरण देताना पंतप्रधानांनी महाराष्ट्राचे उदाहरण दिले जिथे फळे आणि भाज्यांना एपीएमसी कायद्याच्या परिघात मुक्त करण्यात आले होते. या बदलामुळे महाराष्ट्रातील फळे आणि भाज्या उत्पादक शेतकऱ्यांच्या परिस्थितीत बदल झाला आहे याचे उदाहरण देण्यासाठी त्यांनी श्री स्वामी समर्थ फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड चे उदाहरण दिले हा मुंबई-पुण्यामधील शेतकऱ्यांनी स्वतः भरवलेला आठवडी बाजार आहे यामध्ये सुमारे 70 गावातील साडेचार हजार शेतकरी अडते किंवा दलाल यांच्याविना स्वतः जाऊन आपले उत्पादन विकतात.
यावेळी पंतप्रधानांनी आपल्या नव्या पिढीला महापुरुषांबद्दल कथांच्या माध्यमातून माहिती देण्याचे आवाहन केले आणि कथाशास्त्र अधिक लोकप्रिय करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत असे आवाहन केले. वैशाली व्यवहारे देशपांडे यांच्यासारखे अनेक जण मराठी भाषेत सुद्धा हा प्रकार लोकप्रिय करण्यासाठी प्रयत्नशील आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.
येत्या 28 सप्टेंबर रोजी असणाऱ्या शहीद वीर भगतसिंग यांच्या जयंतीची तसेच पुढच्या महिन्यातील महात्मा गांधीजींच्या जयंतीची आठवण करून देत पंतप्रधानांनी या थोर पुरुषांचे विचार आपण समजून घेतले पाहिजे आणि अंगीकारले पाहिजेत असे देखील आवाहन केले. 11 ऑक्टोबर रोजी असणाऱ्या भारतरत्न नानाजी देशमुख यांच्या जयंतीचा उल्लेख करत पंतप्रधान म्हणाले की जेव्हा जयप्रकाश नारायण यांच्यावर पाटणा येथे प्राणघातक हल्ला झाला होता तेव्हा नानाजी देशमुख यांनी स्वतःवर तो वार झेलला आणि जेपींचे प्राण वाचवले.
तसेच यावेळी पंतप्रधानांनी कोरोनासाठी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन करत मास्क वापरणे, चेहरा झाकून बाहेर पडणे, दोन मीटर अंतराचा नियम पाळणे आदी नियमांचे पालन करून स्वतःला तसेच कुटुंबाला निरोगी ठेवण्याचे आवाहन केले.