नागरिकांच्या आरोग्यासाठी मोदी सरकारने भरीव कार्य केले आहे : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
मुंबई, 7 फेब्रुवारी 2021
कोरोना काळात भारताचा मृत्यू दर सर्वात कमी राहिला आहे, नागरिकांच्या आरोग्यासाठी मोदी सरकारने भरीव कार्य केले आहे असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले.
शाह यांच्या हस्ते आज महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पडवे येथे एस एस पी एम वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमाला गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, खासदार नारायण राणे यांच्यासह महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह उद्योग आणि वैद्यकीय क्षेत्रातील अन्य मान्यवर मंडळी उपस्थित होती.
श्री. शाह म्हणाले की, भाजपा सरकार सत्तेत येण्यापूर्वी देशाच्या आरोग्य सेवा क्षेत्राची स्थिती आणि सध्याची स्थिती यात मोठा फरक पडला आहे. २०१४ मध्ये देशातील आरोग्य महाविद्यालयांची संख्या ३८१ होती तर आज देशातील वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या ५६२ झाली. २०१३-१४ च्या अर्थसंकल्पात आरोग्य सेवा क्षेत्रासाठी २७ हजार कोटींची तरतूद केली गेली होती. या वर्षी निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात आरोग्य सेवेसाठी ९४ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. भाजपा सरकार केंद्रात सत्तेत येण्यापूर्वी देशात अवघे दोन एम्स ( अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान ) होते. मोदी सरकारने २२ एम्स ना परवानगी दिली आहे. एकूणच देशाच्या आरोग्य सेवा क्षेत्रात मोठ्या प्रमणावर पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.देशातील वैद्यकीय महाविद्यालयातील जागा ही वाढविल्या जात आहेत. आज स्थानीक भाषेत नीटची परीक्षा देता येते. हे काम केंद्रसरकारन केलं आहे. त्याचबरोबर गावापर्यंत आरोग्यसेवा पुरवण्यासाठी आयुष्यमान भारत ही योजना सुरू केली आहे या महाविद्यालामधून शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या डॉक्टरांना यामुळे खूप मोठ्या संधी आहेत, असं शाह यांनी सांगितले.
आयुष्मान भारत सारख्या योजनांतून गोरगरीबांना मोफत वैद्यकीय उपचार पुरविण्याचे काम केले जात आहे. या योजनेचा फायदा लाखो गरजूंनी घेतला आहे , असेही श्री. शाह यांनी नमूद केले. श्री. नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात रस्ते , सिंचन या सारख्या सुविधा अग्रक्रमाने पुरविताना जनतेला सर्वोत्तम वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्यासाठी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत , असा उल्लेखही श्री. शाह यांनी केला.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने एकजूट दाखवत कोरोनाचा सामना केला, हे फार मोठं यश असल्याचं ही शाह यांनी सांगितलं.
देवेंद्र फडणवीस यांचे मनोगत
स्वप्न पाहणं सोपे असते. पण, स्वप्नपूर्तीसाठी झोप विसरून काम करणे, हे अधिक धाडसी असते. हे मेडिकल कॉलेज सुरू करण्यासाठी नारायण राणे यांनी असेच धाडस केले आहे. मी स्वत: त्यांचा हा संघर्ष जवळून पाहिला आहे.- कोरोनामुळे आरोग्य व्यवस्था हा ऐरणीवरचा विषय आहे. त्यामुळेच या केंद्रीय अर्थसंकल्पात आरोग्यावर अधिक भर देण्यात आला आहे. 28 हजार प्राथमिक आरोग्य केंद्रांना अद्ययावत करण्यात येणार आहे. हे सारे करीत असताना अधिकाधिक डॉक्टरांची गरज भासणार आहे.- कोरोनामध्ये महाराष्ट्राची अवस्था अतिशय वाईट होती. आर्थिक सर्वेक्षणातून महाराष्ट्राची स्थिती अधिक स्पष्ट झाली आहे. सर्वाधिक रूग्ण, सर्वाधिक मृत्यू आणि प्रचंड अव्यवस्था हे महाराष्ट्रात पहायला मिळाले. या काळात भाजपाने मोठे मदतकार्य करून सरकारला मदत केली.- विरोधामुळे व्यथित होण्याची गरज नाही. महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, मुंबई मेट्रो याला पण विरोध झाला. पण, आज त्याला भेटी दिल्या जात आहेत. आपल्याला लोकांसाठी काम करायचे आहे.