राज्याच्या, शेतकऱ्यांच्या हितासाठी निरपेक्षपणे काम करणारे नेतृत्व,ज्येष्ठ नेते विनायकदादा पाटील यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्रद्धांजली

मुंबई, दि. २४ :- सरपंच ते राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम केलेले कृषी, वनशेती, सहकार क्षेत्रात आपला दूरदृष्टीचा ठसा उमटविणारे राज्याच्या आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी निरपेक्षपणे काम करणारे ज्येष्ठ नेतृत्व आपण गमावले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ नेते विनायकदादा पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, विनायकदादा यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करताना कामाचा डोंगर उभा केला. शेतकरी कुटुंबातील विनायकदादा यांनी कुंदेवाडीचे सरपंच ते राज्याच्या मंत्रिमंडळात वेगवेगळी खाती सांभाळताना आपल्या कामाचा ठसा उमटवला. नाशिक जिल्ह्यात सहकार संस्थांचे जाळे तयार केले. वनशेती हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय. वनशेती महामंडळाचे अध्यक्ष असताना त्यांनी अनेक यशस्वी प्रयोग केले. अभ्यासपूर्ण आणि संशोधनात्मक अशा त्यांच्या या प्रयोगांची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही दखल घेण्यात आली. त्यासाठी त्यांना पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. कृषी, सहकार क्षेत्रात काम करणारे प्रयोगशील आणि ज्येष्ठ नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. राज्याच्या आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी निरपेक्षपणे काम करणारे ज्येष्ठ नेतृत्व म्हणून आदराचे स्थान असलेले नेतृत्व आपण विनायकदादांच्या निधनामुळे गमावले आहे. ज्येष्ठ नेते विनायकदादा पाटील यांना विनम्र श्रद्धांजली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

देशातील सहकारी वनशेतीचे जनक अशी ओळख असलेले राज्याचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री विनायकदादा पाटील यांच्या निधनानं शेती, वनशेती, पर्यावरण, सहकार, उद्योग, राजकारण, समाजकारण, साहित्य अशा विविध क्षेत्रात स्वतंत्र ठसा उमटवणारं, कर्तृत्वं गाजवणारं, दूरदृष्टीचं नेतृत्वं हरपलं आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब व कवीवर्य कुसुमाग्रजांचा आशीर्वाद लाभलेल्या ‘वनाधिपती’ विनायकदादांचं निधन ही राज्यासाठी मोठी हानी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार शोकसंदेशात म्हणतात, विनायकदादांनी गावच्या सरपंचपदापासून राज्याच्या मंत्रिपदापर्यंत प्रवास केला. हा प्रवास एकमार्गी नव्हता, राजकीय प्रवासाच्या बरोबरीनं समाजकारण, सहकार, कृषीविकासाच्या माध्यमातूनही सामान्य जनतेची सेवा केली. शेती आणि वनशेतीच्या क्षेत्रात अनेक प्रयोग केले. त्याचा राज्याला मोठा उपयोग झाला. वनशेतीच्या संदर्भातील त्यांच्या कार्याचा गौरव राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर झाला. वनशेतीच्या संदर्भातील त्यांचे विचार पुढं घेऊन जाणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.

ज्येष्ठ नेते विनायकदादा पाटील यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्रद्धांजली
ज्येष्ठ मार्गदर्शक असलेले नाशिकचे दादा हरपले – अन्न व नागरी पुरठवठामंत्री छगन भुजबळ

देशात वनशेती, पर्यावरण, सहकार, उद्योग, राजकारण, समाजकारण, साहित्य अशा विविध क्षेत्रात आपला स्वतंत्र ठसा उमटवणारे ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी मंत्री विनायकदादा पाटील यांच्या निधनाने तीव्र दुःख झाले असून एक आदराचे स्थान असलेले ज्येष्ठ मार्गदर्शक कायमचे हरपले असल्याच्या शोकभावना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या.

श्री. पाटील यांच्या निधनानंतर नाशिक येथील त्यांच्या कदंबवन या निवासस्थानी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर अंत्ययात्रेत सहभागी होऊन नाशिकच्या द्वारका पंचवटी अमरधाम येथे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

शोकभावना व्यक्त करताना छगन भुजबळ म्हणाले, ज्येष्ठ नेते विनायकदादा पाटील यांना महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण व कवीवर्य कुसुमाग्रज यांचे मार्गदर्शन व आशीर्वाद लाभले. तसेच शरदचंद्र पवार साहेब यांच्यासोबत त्यांनी राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम केले. पवार साहेबांचे ते जीवाचे मित्र होते. नाशिकमध्ये सर्व पक्षांचे नेते त्यांचे मार्गदर्शन घेत असत. वनशेती हा त्यांचा अत्यंत आवडीचा आणि अभ्यासाचा विषय होता. त्यामुळे भारतातील सहकारी वनशेतीचे ते जनक ठरले. वनस्पतीच्या तेलापासून डिझेल या इंधनाची निर्मिती होऊ शकते, त्या जेट्रोफा या वनस्पतीची मोठ्या प्रमाणावर तंत्रशुद्ध शेती त्यांनी 1986 मध्ये केली होती. या वनस्पतीपासून प्रायोगिक तत्वावर डिझेल निर्मिती करून त्यांनी तेव्हा जगाचे लक्ष वेधून घेतले होते. विनायकदादा पाटील यांना वनशेतीतील योगदानासाठी महाराष्ट्र शासनाचा कृषीभूषण आणि वनश्री तर भारत सरकारचा इंदिरा प्रियदर्शनी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. फूड ॲण्ड अॅग्रीकल्चरल ऑर्गनायझेशन ऑफ युनायटेड नेशन्सचा आऊटस्टँडिंग ट्री फार्मर ऑफ इंडिया तसेच जीनिव्हा येथील रोलेक्स अवॉर्डही त्यांनी पटकावला होता. हे पुरस्कार मिळवणारे ते पहिले व एकमेव भारतीय होते. यासह विविध पुरस्काराचे ते मानकरी ठरले होते.

पालकमंत्री श्री. भुजबळ म्हणाले, विनायकदादा पाटील यांचा प्रवास थक्क करणारा होता. निफाड तालुक्यात कुंदेवाडीचे सरपंच म्हणून त्यांनी राजकारणात श्रीगणेशा केला. त्यानंतर निफाड तालुका पंचायत समिती सभापती, निफाडचे आमदार, विधान परिषद सदस्य अशी भरारी घेत त्यांनी राज्य मंत्रिमंडळात उद्योग, सांस्कृतिक कार्य, क्रीडा व युवकसेवा अशा विविध खात्यांच्या मंत्रिपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली. सहकार क्षेत्रातही त्यांचा दबदबा राहिला. सहकारी सोसायटीचे अध्यक्ष, नाशिक जिल्हा सहकारी भूविकास बँकेचे अध्यक्ष, निफाड सहकारी साखर कारखान्याचे संचालक, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. राज्यमंत्रिपदाच्या दर्जासह त्यांनी महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळाचे अध्यक्षपदही भूषविले. त्यांच्या निधनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणाऱ्या आणि आदराचे स्थान असलेल्या दादांना आपण कायमचे मुकलो आहोत. विनायकदादांच्या निधनाने पाटील कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मी व माझे कुटुंबीय त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून राज्य शासनाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो, असे छगन भुजबळ म्हणाले.

विनायकदादा पाटील यांच्या निधनामुळे बहुआयामी नेतृत्व हरपले – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

मुंबई, दि. २४ : ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, लेखक, वनाधिपती विनायकदादा पाटील यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. राजकीय, सामाजिक, कृषी, सहकार क्षेत्रात विनायक दादा यांनी आपल्या कामातून वेगळी ओळख निर्माण केली होती. शेती, माती, संस्कृतीसाठी सतत कार्यरत असणाऱ्या विनायकदादा पाटील यांच्या निधनाने बहुआयामी नेतृत्व गमावले आहे, अशा शब्दात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

विनायकदादा पाटील यांनी सरपंच म्हणून राजकारणाचा श्रीगणेशा केला. त्यानंतर पंचायत समिती सभापती, आमदार आणि मंत्री असा त्यांचा चढता राजकीय आलेख राहिला. राज्याच्या मंत्रीमंडळात त्यांनी उद्योग, सांस्कृतिक कार्य, क्रीडा आदी खात्यांची धुरा यशस्वीपणे सांभाळली. सहकार क्षेत्रातही त्यांचा दबदबा राहिला. नाशिक जिल्हा सहकारी भूविकास बँकेचे अध्यक्ष, निफाड सहकारी साखर कारखान्याचे संचालक, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले. वनशेती हा त्यांचा आवडीचा आणि अभ्यासाचा विषय होता. भारतातील सहकारी वनशेतीचे ते जनक होते. जेट्रोफा या वनस्पतीची तंत्रशुद्ध शेती त्यांनी यशस्वीपणे करुन दाखवली. वनशेतीतील त्यांच्या योगदानासाठी महाराष्ट्र शासनाचा कृषीभूषण आणि वनश्री तर भारत सरकारचा इंदिरा प्रियदर्शनी या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यांच्या निधनाने अनुभवी तसेच दूरदृष्टीचा नेता काळाच्या पडद्याआड गेला. विनायकदादा पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून पाटील कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे श्री. थोरात म्हणाले.