केंद्र सरकार गरिबी दूर करण्यासाठी ‘सबका साथ’ द्वारे गरिबांचे सक्षमीकरण करत असल्याचे केंद्रीय वित्त मंत्र्यांचे प्रतिपादन

पीएम जन धन योजना, पीएम स्वनिधी आणि पीएम जनमन योजनांद्वारे थेट लाभ हस्तांतरण म्हणजे जनतेच्या सक्षमीकरणाची साक्ष – केंद्रीय वित्त मंत्री

नवी दिल्ली ,१ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-गरीब कल्याण म्हणजेच देशाचे कल्याण यावर लक्ष केंद्रित करत गरिबांचे सक्षमीकरण करण्यावर सरकारचा भर असल्याचे केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. केंद्रीय अंतरिम अर्थसंकल्प 2024 सदर करताना त्या आज बोलत होत्या. ‘अधिकाराद्वारे गरिबीचा प्रश्न हाताळण्याच्या  याधीच्या दृष्टीकोनाने अतिशय मर्यादित यश मिळाले.  मात्र विकासाच्या प्रक्रियेत गरीब  जेव्हा सशक्त भागीदार झाले तेव्हा त्यांना मदत करण्याच्या सरकारच्या सामर्थ्यात अनेक पटींनी वाढ झाली’ असे त्यांनी सांगितले.  

गेल्या 10 वर्षात ‘सबका साथ’ हे  तत्व अनुसरत सरकारने 25 कोटी जनतेला बहुआयामी  दारिद्र्यातून बाहेर पडण्यासाठी मदत केल्याचे त्या म्हणाल्या. अशा सशक्तीकरण  केलेल्या लोकांची उर्जा आणि निर्धार समन्वयीत करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे सांगून हे त्यांना खऱ्या अर्थाने दारिद्र्यातून बाहेर काढत असल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारने,पीएम जनधन खात्यांद्वारे  34 लाख कोटी रुपयांचे थेट लाभ हस्तांतरण केल्याने सरकारचे 2.7 लाख कोटी  रुपये वाचले आहेत, पूर्वीच्या काळात होणारी  गळती रोखल्याने हे शक्य झाल्याचे त्यांनी  सांगितले. बचत झालेल्या या रकमेमुळे गरीब कल्याणासाठी अधिक निधी पुरवायला मदत झाली आहे.

गरिबांना सक्षम करणाऱ्या योजनांचे उदाहरण देत सीतारामन म्हणाल्या,’पीएम स्वनिधी ने 78 लाख फेरीवाल्यांना कर्ज पुरवठा केला आहे. एकूण आकड्यापैकी 2.3 लाख जणांना तिसऱ्यांदा कर्ज मिळाले आहे.

पीएम जनमन योजना म्हणजे सबलीकरणाचे महत्वाचे उदाहरण असल्याचे सांगून, विकासाच्या वाटचालीत आतापर्यंत बाहेर राहिलेल्या  विशेष वंचित आदिवासी घटकांपर्यंत ही योजना पोहोचत असल्याचे वित्त मंत्र्यांनी सांगितले.