लातूर -धाराशिव जिल्ह्यातील भूकंपग्रस्तांसाठी ट्रस्ट स्थापन करण्याबाबत राज्य शासन सकारात्मक– मंत्री शंभूराज देसाई

नागपूर ,१९ डिसेंबर / प्रतिनिधी :-कोयना भूकंपग्रस्त पुनर्वसन ट्रस्टप्रमाणे लातूर -धाराशिव जिल्ह्यातील भूकंपग्रस्तांसाठी अशा प्रकारचा ट्रस्ट स्थापन करण्याबाबत राज्य शासन सकारात्मक विचार करेल, तसेच एका महिन्याच्या आत या भूकंपग्रस्तांच्या प्रश्नासंदर्भात संबंधित लोकप्रतिनिधींसह बैठक घेण्यात येईल, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधानसभेत दिली.

सदस्य ज्ञानराज चौगुले यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती

मंत्री श्री.देसाई म्हणाले की, कोयना येथे भूकंप झाल्यानंतर तेथील भूकंपग्रस्तांना मदत करण्यासाठी कोयना भूकंपग्रस्त पुनर्वसन ट्रस्ट स्थापन करण्यात आला. त्यातून पुनर्वसनाचे प्रश्न मार्गी लावण्यात आले. याशिवाय, राज्य शासनाने १९६७ मध्ये भूकंपग्रस्तांना २ टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला. तो शासन निर्णय सर्वांसाठी लागू आहे. तसेच लातूर – धाराशिव भागातील भूकंपग्रस्तांचे पुनर्वसन आणि इतर अनुषंगिक प्रश्न सोडवण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील, अशी माहितीही त्यांनी दिली.