केंद्र सरकारकडून कांदा निर्यातबंदी:नाशिक जिल्ह्यात सर्व लिलाव ठप्प

नाशिक,८ डिसेंबर / प्रतिनिधी :-कधी आसमानी तर कधी सुलतानी संकटनांनी शेतकरी नेहमी हवालदिल असतो. अशा त्याच्या शेतमाला चांगला भाव मिळाला तर सुखावतो. शेतकऱ्यांना कधीकाळी रडवणारा कांद्याला चांगला भाव मिळाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावह समाधान दिसत होते. तेवढ्यात केंद्र सरकारने घेतलेल्या एका निर्णयामुळ शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. केंद्र कांद्याचे भाव वाढल्याने केंद्र सरकारने कांद्यांची निर्यात बंदी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यामुळे सध्या चार ते पाच हजार रुपयांपर्यंत विकला जाणारा कांदा जवळपास एक हजार रुपायांपर्यंत खाली उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे सिन्नर येथील बाजार समितीत कांदा घेऊन आलेल्या शेतकऱ्यांनी संतप्त होत रास्ता रोको केला आहे.

साठवून ठेवलेला कांदा अपेक्षित किंमतीला विकाला जाईल या अपेक्षेने बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणायला सुरुवात केली होती. मात्र, केंद्र सरकारने अचानक निर्यात बंदीचे निर्णय घोषित केल्याने त्याचा थेट परिणाम हा कांद्याच्या बाजारभावावर होणार आहे. काद्यांला एक हजार रुपये देखील भाव मिळेल की नाही अशी भिती शेतकऱ्यांना सतावत आहे. सध्या निवडणूका तोंडावर आहेत. सरकार निवडणुकांना डोळ्यांसमोर ठेवून केवळ शहरी लोकांच्या फायद्यासाठी सरकारने निर्यात बंदी लावल्याचं शेतकऱ्यांकडून बोललं जात आहे.

सध्या सरकारच्या निर्णयानुसार ३१ मार्च २०२४ पर्यंत कांद्यावर निर्यातबंदी लावण्यात आली आहे. केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी लावल्याचं कळताच शेतकऱ्यांनी संतप्त होत सरकारच्या विरोधात रोष व्यक्त केला आहे. सिन्नर बाजार समिती समोरील व विवेक चौक येथे कांद्याने भरलेली वाहने रस्त्यावर उभी करुन शेतकऱ्यांनी रास्तारोको केला. त्यामुळे शिर्डी आणि निफाड बाजूने येणारी वाहतुकीवर याचा परिणाम होऊन वाहतूक ठप्प झाली.

संतप्त शेतकऱ्यांनी रास्तारोको केल्याची माहिती मिळताच सिन्नरचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. मात्र सरकारने घेतलेल्या कांदा निर्यातबंदीच्या निर्णयामुळे संतप्त झालेले शेतकरी काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. यावेळी शेतकऱ्यांनी केंद्राच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधात घोषणाबाजी सुरु होती.

केंद्र सरकारच्या निर्यात बंदीमुळे शेतकरी आक्रमक; चांदवडला रस्ता रोको, आंदोलकावर सौम्य लाठी चार्ज

नाशिक : केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदी केल्याने नाशिक जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. सकाळपासून लासलगावसह जिल्ह्यातील विविध भागात कांदा लिलाव ठप्प झाले असून शेतकरी रस्त्यावर उतरल्याने चांदवड येथे मुंबई आग्रा महामार्गावर एक तासापेक्षा जास्त वेळ रास्ता रोको करण्यात आला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज केल्याचेही वृत्त आहे.

चांदवडला माजी आमदार शिरीष कोतवाल यांच्यासह अनेक पक्षाचे पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलन संपल्यावर नेते व स्थानिक आंदोलक शेतकरी निघून गेले. त्यानंतर पोलिस वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत असताना कांदा विक्रीसाठी बाहेरगावाहून आलेल्या तरुण शेतकऱ्यांनी पुन्हा वाहने अडवण्याचा प्रयत्न केला. या तरुणांना पोलिसांनी समजून सांगण्याचा प्रयत्न करूनही आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने अखेर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करत आंदोलकांना रस्त्यावरून पिटाळले आणि वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. या रास्ता रोको दरम्यान वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.

पुन्हा निर्यात बंदीमुळे शेतकरी आक्रमक

कांद्याचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी २८ ऑक्टोबर रोजी कांद्यावरील निर्यात मूल्य दर ८०० डॉलर प्रति टन करण्याचा निर्णय केंद्राकडून घेण्यात आला होता. ३१ डिसेंबर पर्यंत एमइपी ८०० डॉलर प्रति टन ठेवण्यात आले होते. मात्र ८ डिसेंबर २०२३ रोजी पुन्हा वाणिज्य विभागाने नोटिफिकेशन काढून कांद्यावर निर्यात बंदी लादली आहे. ३१ मार्च २०२४ पर्यंत कांदा निर्यात बंदी राहणार आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत.

भाव घसरले

केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदीची अधिसूचना काढल्यामुळे आज सकाळी सर्व बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या बाजारभावात १५०० ते २००० रुपयांची घसरण झाल्यामुळे केंद्र सरकारने घेतलेल्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाचा फटका बसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी जोरदार निषेध केला आहे.