दिव्याज फांऊडेशनतर्फे शहिदांच्या कुटुंबियांचा सत्कार; श्री श्री रविशंकर यांना आतंरराष्ट्रीय शांतता पुरस्कार

मुंबई,२६ नोव्हेंबर / प्रतिनिधी :- 26/11 ला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला 15 वर्ष पूर्ण झाले. यात शहीद झालेल्या पोलिस अधिकारी, कर्मचारी तसेच सैन्यातील शहिदांच्या स्मरणार्थ दिव्याज फाऊंडेशनच्यावतीने  गेट वे ऑफ इंडिया येथे आयोजित केलेला ‘ग्लोबल पीस ऑनर‘  हा कार्यक्रम भर पावसात पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शहिदांच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंधारण मंत्री संजय राठोड,  कौशल्य विकास व उद्योजकता विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार अशिष शेलार, श्री श्री रवी शंकर, दिव्याज फाऊंडेशनच्या अमृता फडणवीस आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री यांनी आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांना प्रदान केला. यावेळी भर पावसात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,  26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात आपल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जीवाजी बाजी लावून मुंबई शहराला वाचवले. आज जी मुंबई दिसते ती त्यांच्या बलिदानाच्या भरोशावर उभी आहे. त्या शहिदांना कोटी कोटी नमन करुन त्यांच्या कुटुंबियांप्रती मुख्यमंत्र्यांनी सहवेदना व्यक्त केल्या. तसेच जगात शांतता नांदावी यासाठी श्री श्री रविशंकर यांनी केलेले काम कौतुकास्पद आहे. शांततेच्या पुरस्कारासाठी योग्य व्यक्तीची निवड केली आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबईला वाचविण्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या 26/11 च्या दहशतवादी हल्यातील शहिदांच्या स्मरणार्थ आयोजित ‘ग्लोबल पीस ऑनर‘ कार्यक्रमाला वर्षाराणिने सुद्धा हजेरी लावली आहे. ग्लोबल शांतता राबविण्यात अग्रेसर असणारे आणि जगाला शांतताप्रिय जागा बनविण्यासाठी सतत कार्यरत असणारे आध्यात्मिक गुरू श्री श्री रवीशंकर यांना आंतरराष्ट्रीय समुदायाने ‘ग्लोबल पीस ऑनर‘ हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला आहे. हा  पुरस्कार त्यांना देऊन एकप्रकारे  पुरस्काराचेच महत्त्व वाढले आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.