इर्शाळवाडीतील दुर्घटनाग्रस्तांसाठी तीन महिन्यात होणार घरे तयार ;खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली माहिती

ठाणे – रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीत १९ जुलै रोजी झालेल्या भीषण भूस्खलनातच्या दुर्घटनेतील कुटुंबांसाठी बांधण्यात आलेली घरे तीन महिन्यांमध्ये राहाण्यासाठी दिली जातील, असे कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी रविवारी सांगितले.

या घटनेत २७ मृतदेह बाहेर काढले गेले तर ५७ बेपत्ता झाले व ते मरण पावल्याचे मानले गेले होते. या दुर्घटनास्थळी २३ जुलैला बचाव कार्य बंद करण्यात आले होते. एनडीआरएफ व अन्य संघटनांनी तेथे मृतदेह शोध घेण्याचे काम केले होते.

त्यावेळी राज्यमंत्री उदय सामंत यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार गावात २२८ लोक होते. गावातील ४३ कुटुंबांपैकी दोन पूर्णपणे नष्ट झाली आहेत, तर उर्वरित ४१, ज्यात १४४ व्यक्ती आहेत, त्यांना कायमस्वरूपी घरांचे बांधकाम बाकी असताना तात्पुरती राहण्याची सोय करण्यात आली आहे. या व्यक्तींसाठी ५०० चौरस फुटांची घरे तीन महिन्यांत तयार होतील. पुढच्या वर्षीची दिवाळी ते स्वतःच्या घरी साजरी करतील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.