नक्षलग्रस्त भागाच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे केंद्र सरकारने आश्वासन दिले – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नवी दिल्ली,६ ऑक्टोबर  /प्रतिनिधी :- विकासाच्या योजनांमुळे राज्यातील नक्षलग्रस्त भागाचा चेहरामोहरा बदलत आहे. शहरी नक्षलवादास प्रतिबंध करण्यासाठी सक्षम यंत्रणेची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन करत, नक्षलग्रस्त भागांच्या विकासासाठी केंद्र सरकारने सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

केंद्रीय  गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली विज्ञान भवन येथे नक्षलवादावरील  आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायंएस. जगन मोहन रेड्डी, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन उपस्थित होते. आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा, केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय; केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि पर्यावरण, वन आणि हवामान बदल राज्यमंत्री अश्विनी चौबे, दळणवळण राज्यमंत्री देवुसिंह चौहान, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला व शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीनंतर श्री शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला व बैठकी दरम्यान झालेल्या चर्चेविषयी माहिती दिली. नक्षलवाद कमी करायचा असेल तर विकासाला महत्त्व दिले पाहिजे. तरुणांच्या हाताला रोजगार दिला पाहिजे व उद्योग उभे केले पाहिजे. सरकारच्या वतीने घेण्यात आलेल्या उपाययोजनां बाबतची चर्चा झाली.  विकासाच्या दृष्टीने रस्ते-पूल बनवले व त्या ठिकाणी शाळा, आरोग्य केंद्र आहेत, त्याचबरोबर सुरजागड प्रकल्प सुरू केला तिथे दहा हजार लोक प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रित्या काम करतात आणि एकंदरित राज्य शासनाला काही विशेष पोलीस अधिका-यांच्या बाबतीत केंद्राकडून मदतीची मागणी केली.        जेव्हा जवान चकमकीत मध्ये जखमी होतात तेव्हा त्यांना तत्काळ रात्री अपरात्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हेलिकॉप्टरद्वारे नाईटलॅडिंगच्या सोयीबाबत केंद्र सरकारकडे मागणी केल्याचे मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी सांगितले. तसेच इतर काही मुद्द्यांवर चर्चा झाली आणि केंद्रीय गृहमंत्री महोदयांनी आपले मुद्दे मान्य केले आणि सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासनही दिल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.  गडचिरोली जिल्ह्यात रेल्वेचे जाळे उभे राहिले, तर मोठया प्रमाणावर विकास होईल आणि उद्योग येतील, तसेच उद्योगांना मोठ्या प्रमाणावर फायदा होईल. वीस  हजार कोटी रुपयांची गुंणतवणूक लॉयड स्टिल कंपनी करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

नांदेड शासकीय रुग्णालयात नुकतेच झालेल्या दुर्घटनेवर दु:ख व्यक्त्‍ करताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, या दुर्घटनेबाबत चौकशीचे व दोषींवर कडक कार्यवाही करण्याचे आदेश दिले असल्याचे त्यांनी सांगितले.  प्रत्येक जिल्हाधिका-यांनी  त्यांच्या विभागातील शासकीय रुग्णालये, स्थानिक स्वराज्य संस्थेचे दवाखाने यांची नियमित पाहणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्हाधिका-यांना औषध खरेदी, आवश्यक मुनष्यबळ वाढीचे अधिकार देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

ही घटना अत्यंत दुर्दैवी असून आगीच्या या घटनेची  मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांकडून वेळोवेळी माहिती घेत आहे. मुंबईचे शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर तसेच मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांना घटनास्थळी भेट देण्याचे निर्देश दिले आहेत, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.  या दुर्घटनेतील मृतांच्या कुटूंबियांना ५ लाख रुपयांची मदत देण्यात यावी तसेच जखमींवरील उपचाराचा खर्च शासनाकडून करण्यात यावा, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.