नांदेड घटनेवर मुंबई हायकोर्टाने सरकारला फटकारले

मुंबई,४ ऑक्टोबर  /प्रतिनिधी :- नांदेडच्या शासकीय रुग्णालयात २४ जणांचा बळी गेल्याची घटना घडल्यानंतर गेल्या २४ तासांत पुन्हा आणखी ८ जणांचा मृत्यू झाल्याने रुग्णालय प्रशासनाची अनास्था समोर आली आहे. गंभीर गोष्ट म्हणजे मृतांमध्ये १२ नवजात बालकांचा समावेश होता. या घटनेची दखल मुंबई उच्च न्यायालयाने स्वत:हून घेत राज्य शासनाची स्पष्ट शब्दात कानउघाडणी केली आहे. डॉक्टरांची कमतरता, औषधांची टंचाई अशा गोष्टीमुळे मृत्यू होत असतील तर अजिबात खपवून घेतले जाऊ शकत नाही, अशा स्पष्ट शब्दात न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे.

औरंगाबाद जिल्हा व शहराचे नामांतर संभाजीनगर आणि उस्मानाबाद जिल्हा व शहराचे नामांतर धाराशिव करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयांना अनेक याचिकांद्वारे हायकोर्टात आव्हान देण्यात आले आहे. त्या याचिकांवरील सुनावणी संदर्भात महाधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ हे कोर्टात आले असताना खंडपीठाने नांदेडच्या घटनेचा उल्लेख केला आणि त्यावरून राज्य सरकारची कानउघाडणी केली.

मुंबई हायकोर्टाकडून राज्य सरकारला तंबी

डॉक्टरांची कमतरता, औषधांची टंचाई त्यामुळे असे मृत्यू होत असतील तर अजिबात खपवून घेतले जाऊ शकत नाही, असे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने राज्याचे महाधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ यांना सांगितले. त्यावर नेमकी घटना काय आणि कशी घडली, या साऱ्याची माहिती घेतो आणि उद्या प्राथमिक म्हणणे मांडतो, असे महाधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ यांनी खंडपीठाला सांगितले.

त्यावर विष्णूपुरीच्या रुग्णालयात किती तज्ज्ञ डॉक्टर आहेत यासह अन्य प्राथमिक माहितीही आम्हाला उद्या द्या, असे तोंडी निर्देश खंडपीठाने महाधिवक्ता सराफ यांना दिले आहेत. तसेच शुक्रवारी याप्रश्नी प्राधान्याने सुनावणी ठेवण्यात आलेली आहे.

नांदेडमध्ये मृत्यूतांडव

नांदेडच्या विष्णूपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात २४ जणांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. मृतांमध्ये १२ नवजात बालकांचा समावेश होता तर १२ प्रौढ रुग्ण होते. त्यांपैकी पाच पुरुष आणि सात महिलांचा समावेश होता. प्रौढ रुग्णांमध्ये एक विषबाधा, चार हृदयविकार, एक जठर व्याधी, दोन किडणी व्याधी, एक प्रसूती गुंतागुंत, तीन अपघात व एक अन्य आजाराच्या रुग्णाचा समावेश होता. २४ जणांच्या मृत्यूनंतर संपूर्ण यंत्रणा खडबडून जागी झाली असली तरी पुन्हा २४ तासांत ८ जणांचा मृत्यू झाला. त्यात ४ बालकांचा समावेश आहे.

सध्या बालरोग विभागात १४२ बालकांवर उपचार सुरू आहेत. त्यातील ४२ बालके अतिगंभीर असल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. नांदेडच्या शासकीय रुग्णालयाच्या खाटांची क्षमता ५०० असली तरी सध्या येथे एक हजार पेक्षा अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. आजमितीस वेगवेगळ्या आजारांनी त्रस्त असलेल्या ७० रुग्णांची मृत्यूशी झुंज सुरू आहे.

सहा रुग्णांचा मृत्यू

नांदेड :- येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात एकुण 1 हजार 585 रुग्णांनी ओपीडीमध्ये उपचार घेतला. सद्यस्थितीत 823 रुग्ण रुग्णालयामध्ये भरती आहेत. मागील 24 तासात म्हणजेच दि. 2 ऑक्टोंबर ते 3 ऑक्टोंबरच्या मध्यरात्रीपर्यंत एकुण 221 नवीन रुग्णांची भरती झालेली आहे. या 24 तासात 118 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, याचबरोबर या 24 तासात 6 अतिगंभीर रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात 2 नवजात बालक व 4 प्रौढ पुरूष यांचा समावेश आहे. गत 24 तासात 29 रुग्णांवर मोठ्या शस्त्रक्रिया तर 10 रुग्णांवर लहान शस्त्रक्रिया करण्यात आल्या. 26 प्रसुती करण्यात आल्या. यात 12 सीझर होत्या तर 14 नॉर्मल प्रसुती झाल्या अशी माहिती वैद्यकीय अधिक्षक गणेश मनुरकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.