उद्धव ठाकरे यांनी वटहुकूम का काढला नाही? देवेंद्र फडणवीसांचा सवाल

जखमी आंदोलनकर्त्यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागितली माफी

मुंबई : मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने उपसमितीची एक बैठक आज झाली. या बैठकीनंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळेस ‘मराठा आरक्षणाबाबत बैठकीमध्ये सखोल चर्चा करण्यात आली. लाठीचार्ज, अश्रूधूर याचा वापर करण्यात आला, ही दुर्दैवी घटना आहे. बळाचा वापर करण्याचे समर्थन केले जाऊ शकत नाही. बळाचा वापर करण्याचं कोणतंही कारण नव्हतं. त्यामुळे यात जे जखमी झाले आहेत, त्यांची शासनाच्या वतीने मी क्षमा मागतो’, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पुढे ते म्हणाले, लाठीचार्जचे आदेश मंत्रालयातून आले असा समज लोकांमध्ये निर्माण केला जात आहे. गोवारी मारले गेले तो आदेश मंत्रालयातून आला होता का? मावळला जे मृत्युमुखी पडले होते तेव्हा ते आदेश तेव्हाच्या मुख्यमंत्री यांनी दिले होते का? त्यावेळी मग का राजीनामा दिला नाही? असा सवाल फडणवीसांनी केला आहे. सरकार या कृती घडवून आणत आहे, असं दाखवण्याचा प्रयत्न झाला. लोकांना देखील कळतंय हे राजकारण सुरू आहे.

फडणवीस म्हणाले की, मराठा आरक्षणाचा निर्णय २०१८ साली झाला. उच्च न्यायालयाने तो मान्य देखील केला होता. आमचं सरकार असताना देखील सर्वोच्च न्यायालयाने त्यावर बंदी आणली नव्हती. सरकार बदलल्यानंतर हे झाले. उद्धव ठाकरे म्हणतात वटहुकूम काढा मग ते मुख्यमंत्री असताना त्यांनी ते का काढलं नाही? असा सवालही फडणवीस यांनी उपस्थित केला.

मराठा आरक्षणासाठी केवळ महायुतीने घेतले निर्णय

ओबीसी आरक्षणाप्रमाणे मराठ्यांना अनेक तरतुदी लागू केल्या आहेत. सरकार मराठा आरक्षणाबाबत अतिशय गंभीर आहे. जालना घटनेवरुन सध्या राजकारण सुरू आहे. महाविकास आघाडीने अनेकदा घोळ घातला. हे आरक्षण महाविकास आघाडीने सुप्रीम कोर्टात घालवले. मराठा आरक्षणासठी केवळ महायुतीने निर्णय घेतले आहेत. जे नेते आता मराठा समाजाचा पुळका आला असे दाखवत आहेत त्यांनीच आरक्षण घालवल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.