मुकेश अंबानींची मोठी घोषणा ; गणेश चतुर्थीला होणार जिओ एअर फायबर लॉन्च

मुंबई : कोणत्याही वायरशिवाय हवेवर फायबरसारखा वेग पुरवणार्‍या, फक्त प्लग इन, चालू केले की काम झाले, अशा जिओ फायबरची सर्वच मंडळी आतुरतेने वाट पाहत होती. ज्यामुळे आपल्या घरी वैयक्तिक वाय-फाय हॉटस्पॉट असू शकणार आहेत, घर किंवा ऑफिस गीगाबिट-स्पीड इंटरनेटशी द्रुतपणे कनेक्ट करणं खरोखर सोपं होणार आहे, अशा जिओ फायबरची लॉन्चिंग डेट आता ठरली आहे. आजच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बोलताना मुकेश अंबानींनी जियो एअर फायबरबाबत ही मोठी घोषणा केली आहे. गणेशचतुर्थीला म्हणजेच १९ सप्टेंबर रोजी जिओ फायबर लॉन्च होणार आहे.

मुकेश अंबानी आजच्या सभेमध्ये म्हणाले की, जिओ ५जी मध्ये आपल्या अर्थव्यवस्थेच्या सर्व क्षेत्रात बदल घडवून आणण्याची क्षमता आहे. यामध्ये कृषी, शिक्षण, एमएसएमई आणि आरोग्य सेवा यांचा समावेश आहे. यासह, कंपनीने दररोज १,५०,००० कनेक्शन देण्याची योजना आखली आहे. कंपनीने जिओ चे नेटवर्क २०० दशलक्ष वापरकर्त्यांपर्यंत विस्तारित करण्याचा दावा केला आहे. कंपनीचा दावा आहे की त्यांचे सुमारे १० दशलक्ष जिओ फायबर ग्राहक आहेत आणि नेटवर्क १.५ दशलक्ष किलोमीटरमध्ये पसरलेले आहे.

मुकेश अंबानी म्हणाले की, कंपनीचे जिओसाठी १ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचं लक्ष्य आहे. जिओ हे नवीन भारताच्या डिजिटल परिवर्तनाचं प्रतीक आहे आणि त्याने आपल्या ध्येयाकडे मोठी पावले उचलली आहेत. Jio 5G चं रोलआउट जगातील कोणत्याही कंपनीद्वारे सर्वात वेगवान 5G रोलआउट आहे. Jio 5G ऑक्टोबरच्या अखेरीस रोलआऊट सुरू होईल आणि डिसेंबर २०२३ पर्यंत ते देशभरात आणलं जाईल. जिओची देशात ८५ टक्के 5G सेवा आहे, ही एक मोठी उपलब्धी आहे.

२०४७ पर्यंत भारत ‘पूर्ण विकसित राष्ट्र’ बनेल

अध्यक्ष मुकेश अंबानी म्हणाले की रिलायन्स इंडस्ट्रीजने गेल्या १० वर्षात एकत्रितपणे $१५० अब्ज पेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. यापुढे भारत ‘आत्मविश्वासाने’ परिपूर्ण असेल आणि २०४७ पर्यंत ‘पूर्ण विकसित राष्ट्र’ बनेल, अशी घोषणाही त्यांनी केली. नवीन रिलायन्स उदयोन्मुख नवीन भारताचा अग्रदूत आहे. रिलायन्सने आर्थिक वर्ष २०२३ मध्ये २.६ लाख रोजगार निर्माण करून रोजगार निर्मितीचे नवे विक्रम प्रस्थापित केले. आम्ही अशक्य वाटणारी उद्दिष्टे निश्चित केली आहेत आणि ती साध्य केली आहेत, असं अंबानी पुढे म्हणाले.