काँग्रेसच्या स्वर्थामुळे प्रणव मुखर्जी आणि शरद पवार यांची  पंतप्रधान पदाची संधी हुकली-नरेंद्र मोदी 

नवी दिल्ली,​९ ऑगस्ट / प्रतिनिधी:- राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शरद पवार यांच्या विरोधात जात भाजप प्रणित शिंदे सरकारशी हातमिळवणी करत सत्तेत सामील झाले. काही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही शरद पवार यांचीच खेळी असल्याचं म्हटलं. राजकीय वर्तुळातून देखील ही शरद पवार यांचीच खेळी असल्याचं म्हटलं जाऊ लागलं. त्यानंतर पुणे येथे लोकमान्य टिळक पुरस्काराच्या वितरण सोहळ्याला विरोधी पक्षांचा विरोध जुगारुन शरद पवार हे पंतप्रधान मोदी यांच्या समवेत व्यासपीठावर उपस्थित राहीले. यामुळे पवारांच्या डोक्यात नेमकं सुरु काय आहे. याबाबत अनेकांच्या मनात कुतुहल निर्माण झालं. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.

काँग्रेसच्या स्वर्थामुळे प्रणव मुखर्जी आणि शरद पवार यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांना पंतप्रधान पदाची संधी हुकली. असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी एनडीएमधून बाहेर पडलेल्या पक्षांचा देखील दाखला दिला. मोदींनी केलेल्या वक्तव्यानंतर शरद पवारांच्या पंतप्रधान पदाची संधी हुकल्याची चर्चा पुन्हा होऊ लागली आहे. पवार यांनी चार वेळा महाराष्ट्रा सारख्या बड्या राज्याचं मुख्यमंत्री पद भूषवलं आहे. तसंच देशाचं संरक्षण मंत्री पद आणि कृषी मंत्री पद देखील त्यांनी भूषवलं. मात्र. त्यांना अद्याप पंतप्रधान होता आलं नाही. प्रफुल्ल पटेल यांनी देखील शरद पवार यांनी ठाम भूमिका न घेतल्याने त्यांची पंतप्रधान पदाची संधी हुकल्याची खंत व्यक्त केली आहे. यानंतर आता खुद्द पंतप्रधान मोदींनी या या विषयावर भाष्य केलं आहे.

या विषयावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, स्वार्थामुळे काँग्रेसने प्रणव मुखर्जी आणि शरद पवार यांच्या सारख्या दिग्गज नेत्यांना पंतप्रधान पदाची संधी मिळाली नाही. काँग्रेसने त्यांच्या वयक्तीक स्वार्थामुळे अनेक नेत्यांच खच्चीकरण केलं. भाजप मात्र काँग्रेसप्रमाणे अहंकारी नाही. त्यामुळे भाजप सत्तेतून पायउतार होणार नाही, असं मोदी म्हणाले.

‘युती ठाकरेंनी तोडली, भाजपने नाही’

 महाराष्ट्रातील युती आम्ही नाही तर उद्धव ठाकरे यांनी तोडली असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी  एनडीए खासदारांच्या बैठकीत काँग्रेसवर हल्लाबोल केला.

नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात मंगळवारी रात्री एनडीएच्या खासदारांची बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसच्या अनेक अहंकारी उदाहरणांचा दाखला दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, शिवसेना भाजपसोबत सत्तेत होती त्यावेळी सामना वृत्तपत्रात माझ्यावर टीका केली जायची. कारण नसताना वाद निर्माण होत असे. आम्ही अनेक वेळा सहन केले. तुम्हाला सत्तेत पण राहायचे आहे आणि तुम्हाला आमच्यावर टीका पण करायची आहे या दोन गोष्टी एकत्र कशा चालतील? बिहारमध्ये कमी संख्या असतानाही नितीशकुमार यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले. एकनाथ शिंदे आले आणि त्यांना मुख्यमंत्रीपद दिले. आमचे मित्र आमच्यासाठी महत्वाचे आहेत. आपण एकत्र राहू, सर्वांचा आदर केला जाईल. आपल्याला एनडीए म्हणून काम करायचे आहे, काँग्रेसप्रमाणे भाजप अहंकारी नाही, त्यामुळे भाजप सत्तेवरून पायउतार होणार नाही, असा विश्वासही मोदी यांनी यावेळी व्यक्त केला.

महाराष्ट्राच्या विकासासाठी तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. यावेळी पीएम मोदींनी राजस्थानच्या खासदारांना संबोधित करताना सांगितले की, राजस्थानमधील कोणत्याही सरकारची स्थिती आता इतकी वाईट नाही. भारताच्या विकासासाठी राजस्थानची निवडणूक जिंकणे आवश्यक आहे. राजस्थानची निवडणूक जिंकणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. मी वैयक्तिकरित्या घराणेशाहीच्या राजकारणाच्या विरोधात असल्याचे पंतप्रधान म्हणाले.