पावसाळ्यात वटवृक्षाची लागवड करा – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

‘मिशन बिलियन बनियन’चा थाटात प्रारंभ

नागपूर, २३ जुलै  / प्रतिनिधी :-   दिवसेंदिवस वृक्षतोडीमुळे वृक्षांची संख्या घटत आहे. वड व पिंपळ आपल्या पौराणिक महत्वासोबतच निसर्गात जास्तीत जास्त ऑक्सीजनचा पुरवठा करतात. येत्या पावसाळयात मोठ्या प्रमाणात वटवृक्षांची  लागवड करुन वृक्षारोपण कार्यक्रमास हातभार लावा, निसर्ग रक्षणास सहकार्य करा, असे आवाहन केंद्रीय महामार्ग व रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले.

वाढती लोकसंख्येमुळे वृक्षतोड वाढत आहे, अशा परिस्थितीत वृक्षांची संख्येत मोठ्या प्रमाणात घट होत आहेत. यासाठी ‘मिशन बिलीयन बनियन’ हा वटवृक्ष लागवडीचा उपक्रम आज पासून राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा प्रारंभ मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या परिसरात करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

हा उपक्रम करण कोठारी ज्वेलर्स, नागपूर यांच्या विद्यमाने राबविण्यात आला. यावेळी  उपक्रमाचे स्वयंसेवक, सामाजिक कार्यकर्ते, महिला व नागरिक उपस्थित होते. नागपुरातील प्रत्येक कुटुंबाने एक झाड लावावे, यापूर्वी नागपुरातील प्रत्येकाने आपल्या घरात संत्र्याचे झाड लावावे या आवानालाही अनेकांनी प्रतिसाद दिला होता. वडवृक्ष लावणीच्या या अभियानात सहभागी व्हावे, निसर्गाच्या हिरवेपण जपण्याची जबाबदारी, आपणा सर्वांची आहे त्यासाठी सगळ्यांनी पुढे यावे असेही त्यांनी यावेळी सांगितले. वृक्ष लागवडीच्या अभियानास त्यांनी शुभेच्छा दिल्या.