अनाथांचा नाथ! एकनाथ शिंदे यांची इर्शाळवाडी दुर्घटनेतील अनाथ मुलांसाठी धाव

मुंबई,२२ जुलै  / प्रतिनिधी :- डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेने इर्शाळवाडी दुर्घटनेतील अनाथ मुलांचे पालकत्व स्वीकारले आहे. ही मुले वयाची १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत त्यांच्या शिक्षण आणि पालनपोषणाची जबाबदारी या संस्थेने घेतली आहे. त्यांच्या आवश्यक त्या सर्व गरजा पूर्ण करण्यात येणार आहे.

दरम्यान, अचानक कोसळलेल्या या नैसर्गिक संकटात दुर्घटनाग्रस्तांच्या पाठिशी राज्य सरकार खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिली. इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांच्या तात्पुरत्या निवारा केंद्रास डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शनिवारी भेट देऊन पीडितांचे सांत्वन केले. दुर्घटनाग्रस्त इर्शाळवाडीत एकूण १ ते १८ वयापर्यंतचे ३१ मुले असून त्यापैकी २१ जण आश्रम शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत.

या मुलांशी संवाद साधताना डॉ.गोऱ्हे यांनी मुलांना लगेच कामाला न जाता शिक्षण पूर्ण करण्याबाबत सांगितले. काहीही लागल्यास त्यांच्या फोनवर संपर्क साधण्यासाठी स्वतःचा नंबर अनाथ मुलांना दिला. यावेळी आमदार मनीषा कायंदे, महेंद्र थोरवे, अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख मंगेश चिवटे उपस्थित होते.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी दूरध्वनीद्वारे अनाथ बालकांशी संवाद साधला. स्वतः मुख्यमंत्री मदत व बचाव कार्यावर लक्ष ठेवून आहेत. शंभर टक्के पुनर्वसन होईपर्यंत मदत कार्य सुरू राहील, असा विश्वास डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या बालकांना दिला. त्यांना मदत साहित्याचे वितरण करण्यात आले.

फडणवीसांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांचाही मदतीचा हात

इर्शाळवाडी दुर्घटनेतील पीडितांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनीही मदतीचा हात दिला आहे. या पीडितांसाठी फडणवीस यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आपल्या एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचा निर्णय शनिवारी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जाहीर केला.