‘महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज’ उपक्रमात शैक्षणिक संस्था व विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई : “नाविन्यता, कल्पकता यांना भौगोलिकतेच्या मर्यादा नसतात. त्या कुठेही यशस्वी होऊ शकतात. नवकल्पनांना योग्य पाठबळ मिळण्याची आवश्यकता असते. परंतु, योग्य व्यासपीठ व मार्गदर्शनाअभावी चांगल्या कल्पना प्रत्यक्षात उतरू शकत नाहीत. राज्यातील विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग कार्यरत आहे”, महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज या उपक्रमात जास्तीत जास्त शैक्षणिक संस्था व विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले

राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी व नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमाचे अनावरण १५ जुलै २०२३ रोजी  कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री श्री. लोढा यांच्या हस्ते ठाणे येथे करण्यात आले.

महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज उपक्रम

राज्यातील सर्व जिल्ह्यातील विद्यार्थी नवउद्योजक व त्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पनांचा शोध घेवून त्यांना आवश्यक व्यासपीठ उपलब्ध करुन देणे तसेच या नवउद्योजकांना प्रोत्साहन, तज्ज्ञ मार्गदर्शन, निधी व आवश्यक पाठबळ पुरवणे हे महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

या उपक्रमात सहभागी होण्यासाठी राज्यातील कोणत्याही महाविद्यालय अथवा औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे सध्या शिक्षण घेत असलेले विद्यार्थी /विद्यार्थिनी किंवा जास्तीत जास्त ३ विद्यार्थ्यांचा समूह पात्र असेल. तसेच अर्ज करण्यासाठी विद्यार्थी /विद्यार्थिनी /समूहाकडे नावीन्यपूर्ण संकल्पना असणे आवश्यक आहे.

हा उपक्रम ३ टप्प्यात आयोजित करण्यात येणार असून प्रथम टप्प्यात राज्यातील महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, इतर शैक्षणिक संस्थांची नोंदणी करण्यात येत आहे. त्यानंतर त्या संस्थेतील विद्यार्थी स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजमध्ये आपल्या नवसंकल्पनांचे अर्ज करू शकतील. संस्थास्तरावर उत्तम दोन संकल्पनांची निवडही प्रथम टप्प्यात करण्यात येईल.

या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्यात जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांकडून प्राप्त झालेल्या उत्तम संकल्पनांमधून, सर्वोत्कृष्ट १०० संकल्पनांची जिल्हास्तरीय सादरीकरणासाठी निवड करण्यात येईल. निवडलेल्या १०० नवउद्योजकांसाठी विशेष एकदिवसीय मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात येईल. प्रत्येक जिल्ह्यातील सादरीकरण सत्रातून सर्वोत्कृष्ट १० विजेते निवडले जातील. सर्वोत्कृष्ट १० विजेत्यांमध्ये, ३० टक्के महिला, ५० टक्के औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे विद्यार्थी व One District One Product (ODOP) संबंधित नवसंकल्पनांना प्राधान्य असेल. जिल्हास्तरीय विजेत्यांना प्रत्येकी रु. १ लाख बीज भांडवल देण्यात येणार आहे.

या उपक्रमाच्या तिसऱ्या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यातील १० अशा एकूण ३६० नवउद्योजकांना १२ महिन्यांचा विशेष इन्क्युबेशन प्रोग्राम दिला जाणार असून इन्क्युबेशन प्रोग्रामनंतर या ३६० नवसंकल्पनांचे राज्यस्तरीय  सादरीकरण करण्यात येणार आहे. यातून सर्वोत्कृष्ट 10 नवउद्योजकांना प्रत्येकी रु. 5 लाखांचे बीज भांडवल देण्यात येणार आहे. या उपक्रमाची विशेष बाब म्हणजे शैक्षणिक संस्था व जिल्ह्यांना या उपक्रमाची व्याप्ती वाढवून राज्याची नावीन्यपूर्ण परिसंस्था बळकट करण्यासाठी विशेष परितोषिकेही दिले जाणार आहेत. या उपक्रमाच्या अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या अधिकृत संकेतस्थळ www.msins.in अथवा स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजच्या  www.schemes.msins.in या पोर्टलला भेट द्यावी.असे आवाहन कौशल्य विकास विभागाने केले आहे.