ठाकरे गट आता काय करणार? अंबादास दानवे यांना ‘हा’ धोका

ठाकरे गटातील विधान परिषदेच्या आमदारांची संख्या आता कमी होऊन ९ वर झाली आहे

मुंबई ,१९ जून /प्रतिनिधी :-उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला लागलेली गळती काही केल्या कमी व्हायचं नाव घेताना दिसत नाही. ठाकरे गटाच्या विधान परिषदेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी रविवारी रात्री शिंदेगटात प्रवेश केला. ठाण्यातील आनंद आश्रम या ठिकाणी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी मनीषा कायंदे यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला. वर्षभरात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात होत असलेले बदल आणि त्यांच्या कामाची गती पाहूनच आपण शिंदे यांच्या ओरिजनल शिवसेनेत प्रवेश केल्याचं मनीषा कायंदे यांनी म्हटलं आहे. केवळ दोषारोप करणे तसंच लोक पक्ष सोडून का जात आहेत याचे आत्मपरिक्षण करणे, अशी अनेक कारणं असल्याचं त्या यावेळी म्हणाल्या. भविष्यात अनेक जण इकडे (शिंदे गटात)येतील, कारण त्यांचा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे. अजून अनेक महिलांचे ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश होतील असं त्यांनी सांगितलं आहे.

मनीषा कायंदे यांच्या शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरे गटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मनीषा कायंदे यांनी ठाकरे गटाची साथ सोडल्याने ठाकरे गटाचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद धोक्यात येण्याची शक्यता आहे. कायंदे या शिंदे गटात गेल्याने ठाकरे गटाच्या जागा कमी झाल्या आहेत. ठाकरे गटातील विधान परिषदेच्या आमदारांची संख्या आता कमी होऊन ९ वर झाली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची संख्या देखील ९ झाली आहे. अंबादास दानवे हे सध्या शिवसेना ठाकरे गटाचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने विधान परिषदेच्या विरोधी पक्षेनेते पदावर दावा केल्यास दानवे याचं पद जाण्याची शक्यता आहे, अशी सध्या चर्चा सुरु आहे.

सद्या विधान सभेच्या एकून जागांपैकी भारतीय जनता पार्टीकडे २२ जागा आहे. ठाकरे गटाकडे ९ जागा आहे. तर शिंदे यांच्याकडे २ जागा विधानपरिषदेच्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडे देखील विधान परिषदेत ९ जागांच संख्याबळ आहे. काँग्रेसकडे ८ तर इतर अपक्षांकडे एकून ७ जागा आहे. विधानपरिषेद्या एकूण २२ जागा सध्या रिक्त आहेत. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना
ठाकरे गटाकडे समान ९ जागा असल्याचे ठाकरे गटाचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेपद जाईल अशी चर्चा सुरु आहे.

अजितदादांनीही टाकली गुगली

विधान परिषदेच्या आमदार मनिषा कायंदे आता शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत दाखल झाल्यामुळे विधान परिषदेतील ठाकरेंच्या पक्षाचं संख्याबळ घटलंय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या समान झाली आहे, त्यामुळे आता विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेतेपदावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून दावा सांगितला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

‘विधानसभा, विधान परिषदेमध्ये ज्यावेळेस विरोधी पक्षनेते पद देण्याची वेळ येते त्यावेळेस ज्यांच्या जागा सर्वात जास्त आहेत त्यांना ते विरोधी पक्षनेते पद देतात. 2014 ला राष्ट्रवादीचे 41 आणि काँग्रेसचे 42 निवडून आले, त्यावेळी काँग्रेसकडे 5 वर्ष विरोधी पक्षनेते पद होतं. आम्ही याबद्दल विचार केला नाही, पण तुम्ही गोष्ट लक्षात आणून दिल्यामुळे विचार नक्की करू,’ असं अजित पवार म्हणाले.

दुसरीकडे अंबादास दानवे यांनी मात्र आपल्या पदाला कोणताही धोका असणार नाही, असा विश्वास व्यक्त केला आहे. शिवसेनेची संख्या तांत्रिकदृष्ट्या जास्त आहे. जे पक्षातून गेले आहेत, ते पक्षाचे अधिकृत नाहीत, त्यामुळे कुणी विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर दावा करेल, असं वाटत नाही, असं अंबादास दानवे म्हणाले आहेत.

सध्या विधान परिषदेचं उपसभापती आणि विरोधी पक्षनेते पद हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे आहे. नीलम गोऱ्हे या विधानपरिषदेच्या उपसभापती आहेत, तर अंबादास दानवेंकडे विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी आहे. मात्र आता ठाकरेंच्या आमदारांची संख्या घटल्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून विरोधी पक्षनेते पदासाठी आग्रह केला जाण्याची शक्यता आहे.