उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली स्वातंत्र्य सैनिक भास्कर नायगांवकर यांची सदिच्छा भेट

धाराशिव , ​१६​ जून   / प्रतिनिधी :- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज त्यांच्या  धाराशिव जिल्हा दौऱ्यात स्वातंत्र्यसैनिक भास्कर सांभराव नायगांवकर यांच्या घरी जावून त्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी आमदार सर्वश्री  राणा जगजितसिंह पाटील, प्रविण दरेकर, अभिमन्यू पवार आदी मान्यवर  उपस्थित होते.

उपमुख्यमंत्र्यांनी श्री.नायगांवकर यांच्याशी संवाद साधतांना त्यांचे स्वातंत्र्य लढयातील अनुभव जाणून घेतले. श्री. नायगावकर यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त उपमुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्य सैनिकांना भेटण्यासाठी वेळ दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. त्यांनी उस्मानाबाद येथे केंद्रीय विद्यापीठ स्थापन करण्याची, हैदराबाद ​ मुक्ती संग्रामावर आधारित चित्रपट निर्मिती करण्याची, स्मारके उभारण्याची मागणी केली. याप्रसंगी चिलवडी येथील स्वातंत्र्य सैनिक बुबासाहेब जाधव यांनीही उपमुख्यमंत्र्यांशी संवाद साधला.त्यांनी हैदराबाद ​ मुक्तीसंग्रामात चिलवडी व उस्मानाबाद जिल्ह्याच्या योगदानाबाबत माहिती दिली. यावेळी श्री.जाधव यांनी  “असे झुंजलो आम्ही” आणि जिल्हा माहिती कार्यालयाकडून प्रकाशित करण्यात आलेली “वैभवशाली उस्मानाबाद” ही पुस्तके भेट दिली तर उपमुख्यमंत्र्यांच्या  हस्ते श्री. नायगांवकर यांच्या “माझा मी चा शोध” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी त्यांनी  “हा एक जन्म”, “एक जिज्ञासा” आणि “सागरातील निवडक रत्ने” ही पुस्तके उपमुख्यमंत्र्यांना  भेट दिली.