पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना शेतकऱ्यांना ठरेल लाभदायक – रोहयो व फलोत्पादनमंत्री संदिपान भुमरे

मुंबई, दि.१८ : राज्याच्या कृषी विभागामार्फत ‘विकेल ते पिकेल’ या अभियानाचा शुभारंभ नुकताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला. त्याचवेळी त्यांनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेचाही शुभारंभ केला. ही योजना शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरणार असल्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी सांगितले.

श्री.भुमरे म्हणाले, महाराष्ट्र राज्य हे फलोत्पादनामध्ये अग्रेसर आहे. तसेच मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकाची व्यावसायिक पद्धतीने लागवड करून उत्पादन घेतले जाते. त्याची निर्यातही मोठ्या प्रमाणात करण्यात येते. मागील दोन-तीन वर्षापासून भाजीपाला पिकाचे निर्यातक्षम व विषमुक्त उत्पादन करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. त्यामुळे भाजीपाला अभियानाच्या चांगल्या जाती व चांगली रोपे याची मागणी वाढत आहे. त्यादृष्टीने भाजीपाला रोपांची नियंत्रित वातावरणामध्ये तयार झालेली कीड व रोगमुक्त भाजीपाला रोपांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.

पहिल्या टप्प्यात ५०० लाभधारकांची प्रायोगिक तत्त्वावर निवड

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेच्या पहिल्या टप्प्यात 500 लाभधारकांची  प्रायोगिक तत्त्वावर निवड करण्यात येणार आहे. लाभार्थी प्रामुख्याने कृषी पदवी किंवा पदविकाधारक असतील. महिला बचत गटास प्राधान्य देण्यात येईल. त्याचप्रमाणे भाजीपाला उत्पादक शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या यांना देखील प्राधान्य देण्यात येणार असल्याचे श्री. भुमरे यांनी सांगितले.

भाजीपाला पिकाची दर्जेदार व कीडरोग मुक्तरोपे निर्मिती

500 लाभधारकांसाठी 500 एकर भाजीपाला रोपवाटिका तयार करण्यात येणार आहे. योजनेचा कालावधी दोन वर्षांचा आहे. या योजनेमुळे भाजीपाला पिकाची दर्जेदार व कीडरोग मुक्त रोपे निर्मिती उत्पादनात वाढ होणार आहे. तसेच स्थानिक शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायाची संधी उपलब्ध होणार आहे. पीक रचनेत देखील बदल  होणार आहे. शेतकऱ्यांना प्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहे.

ऑनलाईन अर्ज मागविण्यात येणार

या अभियानाची सुरुवात करताना सर्वप्रथम ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतील. प्रत्येक तालुक्याला लक्ष्यांक देण्यात येईल लक्ष्यांकापेक्षा जास्त अर्ज आल्यास तालुकास्तरावर सोडत पद्धतीने यादी तयार केली जाईल. तालुकास्तरावरुन पूर्व संमती देण्यात येईल आणि कामाची सुरुवात करण्यात येईल. प्रथमत: 60 टक्के अनुदान देण्यात येईल व रोपांची विक्री सुरू झाल्यानंतर दुसरा हप्ता 40% शेतकऱ्याच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा केला जाईल.

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेचे लाभार्थी पात्रता निकष
  1. अर्जदाराकडे स्वत:च्या मालकीची किमान ०.४० हे.(१ एकर) जमीन असणे आवश्यक आहे.
  2. रोपवाटिका उभारण्यासाठी पाण्याची कायमची सोय असणे आवश्यक आहे.
  3. महिला कृषी पदवी धारकांना प्रथम प्राधान्य राहील.

4.महिला गटास द्वितीय प्राधान्य.

  1. भाजीपाला उत्पादक अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी व शेतकरी गट यांना प्राधान्य.
  2. अनुसूचित जाती व जमाती यांना केंद्र सरकारच्या मापदंडाप्रमाणे लाभ देण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *