महाराष्ट्र राज्य निर्मितीचा ६३ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

पालकमंत्री डॉ.सावंत यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

धाराशिव ,​१ मे ​/ प्रतिनिधी :-धाराशिव जिल्ह्यात मार्च महिन्यापासून अवेळी पाऊस,गारपिटीने शेती पिकांच्या मोठया प्रमाणात नुकसान  झाले आहे. या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता 6 कोटी 24 लाख रुपये इतक्या निधीची मागणी शासनास करण्यात आलेली आहे कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे, ही शासनाची भूमिका आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी आज येथे केले. महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रागंणात मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम पालकमंत्री यांच्या हस्ते पार पडला याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपजिल्हाधिकारी अविनाश कोरडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राजाभाऊ गलांडे,जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने, आदी मान्यवर उपस्थित होते.

गेल्या वर्षी जून ते ऑक्टोबर मध्ये झालेल्या सततच्या पाऊस,अतिवृष्टी व गोगलगाय किडीमूळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना 298 कोटी पेक्षा जास्त निधी वितरीत झाला आहे.याच बरोबर अवेळी पाऊस व गारपीटीमूळे बाधित झालेले 2 हजार 652 शेतकऱ्यांना अनुदान वाटपाची कार्यवाही सुरू आहे.सप्टेंबर- ऑक्टोबर मधील बाधित शेतकऱ्यांना पिक नुकसानीसाठी 222 कोटी 43 लाख निधीची मागणीही शासनाकडे करण्यात आली आहे. असेही डॉ.सावंत यावेळी म्हणाले.

यावेळी पालकमंत्री डॉ.सावंत म्हणाले, आज महाराष्ट्र दिना पासुन संपूर्ण महाराष्ट्रात “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” योजनेचे शुभारंभ होणार आहे, प्रत्येक जिल्हायातील नागरी भागात हे दवाखाने कार्यान्वित होणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांना मी ही संकल्पना सांगितली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ती मान्य केली, या दवाखान्या मध्ये सर्व उपचार मोफत मिळणार असुन मोफत तपासणी व गर्भवती माता संदर्भातही सर्व आरोग्य सुविधा मिळणार आहेत. तेंव्हा “मा.हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यात” देण्यात येणाऱ्या मोफत आरोग्य सेवांचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा असे आवाहनही पालकमंत्र्यांनी यावेळी केले.

पालकमंत्री पुढे म्हणाले, गेल्या दोन वर्षापासून चालू असलेल्या कोरोना साथीचा सामना करतांना सर्वसामान्यांचे आरोग्य उंचावण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. 28 एप्रिल 2023 पर्यंत जिल्हयात 76 हजार 371 कोरोना रुग्णांचे निदान करण्यात आले आहे.त्या पैकी 97.16 टक्के म्हणजेच 74 हजार 216 रुग्ण बरे होउन घरी गेले आहेत.रुग्ण बरे होण्याचे प्रमाण समाधानकारक आहे. जिल्हा प्रशासनातर्फे ऑक्सीजन बेड व्हेंटिलेटर्स,बालकासाठीचे बेड आदींची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. नागरिकांनीही अनावश्यक गर्दी टाळावी मास्कचा वापर करावा, वारंवार हात स्वच्छ धुवावेत.

पुढे बोलताना पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत  म्हणाले,जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत “हर घर नल से जल” अंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबासाठी प्रती माणशी प्रती दिनी 55 लिटर प्रमाणे पाणी देण्याचे नियोजन आहे. 2023-24 साठी 60 हजार पेक्षा जास्त नळ जोडण्या देण्याचे प्रस्तावित असून डिसेंबर 2023 अखेर सर्व कामे पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.नीती आयोगाने उस्मानाबाद जिल्हयाचा समावेश आकांक्षित जिल्हयांमध्ये केला आहे.जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे आणि त्यांचे सहकारी अधिकारी या जिल्ह्याला मागासलेल्याच्या यादीतून बाहेर काढण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. शिक्षण,कृषी, आरोग्य,कौशल्य विकास,वित्तीय सुधारणा अशा मुख्य क्षेत्रात चांगले काम होत आहे. असेही पालकमंत्री यावेळी म्हणाले.