सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांमध्ये अधिक पारदर्शकता येणार – मंत्री रविंद्र चव्हाण

प्रकल्प व्यवस्थापन माहिती प्रणालीचे उद्घाटन

मुंबई,२४  एप्रिल / प्रतिनिधी :-   सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजात अधिक पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने व विभागाची कामे अधिक लोकाभिमुख होण्यासाठी ‘प्रकल्प व्यवस्थापन माहिती प्रणाली’ (प्रोजेक्ट मॅनेजमेंट इन्फॉरमेशन सिस्टिम) अधिक फायदेशीर ठरणार आहे, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज केले.

सी-डॅक व एमआरएसएसी यांच्या सहकार्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने विकसित केलेल्या प्रोजेक्ट मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टिम या संगणक प्रणालीचे (PMIS) उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते आज यशवंतराव चव्हाण सेंटर येथे करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

मंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले की, सार्वजनिक बांधकाम विभागात आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिक वापर करण्याला वाव असल्याने या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून या विभागामध्ये अधिक सकारात्मक बदल करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्या व पदोन्नतीची प्रक्रिया अतिशय पारदर्शकपणे राबवत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या कामामध्ये अधिक पारदर्शकता आणून आपल्या कार्यपद्धतीमध्ये नाविन्यपूर्ण संकल्पना राबवणे गरजेचे आहे, असेही मंत्री श्री. चव्हाण यांनी नमूद केले.

या नवीन प्रणालीच्या (पी. एम. आय. एस.) व्यवस्थेला लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित्या येणाऱ्या एक लाख पाच हजार किलोमीटर रस्त्यांची सद्यस्थिती,  31 हजार पेक्षा जास्त छोट्या-मोठ्या इमारती, पूलांची परिस्थिती, त्यातील कमतरता, रस्त्यांची प्रगतीपथावरील कामे, अपूर्ण कामे आदींची माहिती या नवीन संगणकीय प्रणालीमध्ये उपलब्ध होणार आहे.

आपल्या विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या रस्त्यांवरील खड्डे दुरुस्त करणे हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्तव्य आहे. तशी आपल्याकडे व्यवस्था तयार आहे आणि त्या व्यवस्थेमधून आपल्याला हे सर्व करायचे आहे, असे सांगतानाच मंत्री श्री.चव्हाण म्हणाले की, एकदा पडलेल्या खड्ड्याला जर दुरुस्त केले नाही तर तो हळूहळू वाढत जातो. त्याची कालबद्ध वेळेत दुरुस्ती करण्याकडे लक्ष देण्याची आणि यासाठी विभागाने पूर्ण ताकदीने काम करण्याची गरज असल्याचेही मंत्री श्री. चव्हाण यांनी स्पष्ट केले.

याप्रसंगी रस्ते विभागाचे सचिव सदाशिव साळुंके, बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते, पुण्याचे मुख्य अभियंता चव्हाण, मुंबई विभागाचे मुख्य अभियंता राजभोर आदी मान्यवर उपस्थित होते.