‘स्वच्छोत्सवा’त महाराष्ट्रातील १२ स्वच्छता दूत महिलांचा सहभाग

नवी दिल्ली,२९ मार्च / प्रतिनिधी:- स्वच्छ भारत मिशन (नागरी) अंतर्गत साजरा करण्यात आलेल्या ‘स्वच्छोत्सवा’त महाराष्ट्रातील 12 स्वच्छतादूत महिलांचा सहभाग असून अन्य राज्यातील एकूण 300 स्वच्छतादूत महिला उपस्थित होत्या.

येथील हॅबिटॅट सेंटर मध्ये केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाच्यावतीने ‘स्वच्छ भारत मिशन- नागरी’च्या अंतर्गत ‘स्वच्छोत्सव’ उपक्रमात ‘आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवस’ (International day of Zero Waste) राबविण्यात आला. या कार्यक्रमास केंद्रीय गृहनिर्माण व नागरी व्यवहार मंत्री हरदीपसिंग पुरी, सचिव मनोज जोशी आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्यातून स्वच्छ भारत अभियानाचे सहायक आयुक्त महेश चौधरी उपस्थित होते.

यामध्ये देशभरातील स्वच्छता क्षेत्रातील कार्यरत निवडक बचत गटातील प्रातिनिधिक महिला स्वच्छतादूत या कार्यक्रमास उपस्थित होत्या. महाराष्ट्रातील  नगरपालिका, महानगरपालिकेतील 12 महिलांचा समावेश होता.

बचत गटांच्या माध्यमातून स्वच्छतेशी संबंधित काम करीत असताना मान, सन्मान आणि धन आयुष्यात कमविता आले असल्याची भावना यावेळी सर्वच महिलांनी व्यक्त केली. हाताला मिळालेले  कोणतेही काम लहान – मोठे नाही. त्यातून मिळणारे समाधान महत्वाचे असल्याची प्रतिक्रियाही यावेळी या महिलांनी दिली.