महाराष्ट्राच्या प्रगतीची गुढी आणखी डौलाने उभारूया – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नववर्ष प्रारंभ, गुढीपाडव्यानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा

मुंबई,२१ मार्च  /प्रतिनिधी :-आपला महाराष्ट्र प्रगतीशील आहे. नवनव्या संधींना गवसणी घालण्याची महाराष्ट्राची क्षमता आहे. अशा संधी शोधूया आणि महाराष्ट्राच्या प्रगतीची गुढी उंच आणि आणखी डौलाने उभारूया, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी नववर्ष प्रारंभाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नवे वर्ष आरोग्यदायी ठरावे. सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि भरभराट घेऊन येवो, अशी मनोकामनाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.

मराठी नववर्ष प्रारंभ अर्थात गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला दिलेल्या शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की, नववर्ष आपल्या सर्वांच्या आयुष्यात चैतन्याचे पर्व घेऊन येते. या निमित्ताने आपण ऋतुचक्रातील बदलाचा आनंददायी उत्सव साजरा करतो. अशा या नववर्षाच्या उत्साही क्षणांतून आपल्याला नवनिर्मितीची प्रेरणा मिळते. ही प्रेरणा घेऊन आपण महाराष्ट्र कृषी, शिक्षण, आरोग्य, उद्योग अशा सर्वच क्षेत्रात अग्रेसर रहावा यासाठी प्रयत्न करूया.

नववर्षाचे स्वागत करताना आपण पर्यावरणाचे भान देखील बाळगूया. आपल्या परिसरात स्वच्छता राखूया. पाणी, हवा यांचं प्रदूषण रोखण्याची जागरुकता निर्माण व्हावी, असे प्रयत्न करूया. त्यासाठी आपल्या सर्वांच्या मनात नवसंकल्पनांची पालवी फुलावी, हीच सदिच्छा. महाराष्ट्राच्या प्रगतीची गुढी आणखी उंच उभारूया, तिची पताका जगाच्या क्षितिजावर अभिमानाने आणि डौलाने फडकत राहावी, असा निर्धार करूया, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे. नववर्ष आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि भरभराट घेऊन येवो. सर्वांना गुढीपाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा, असेही मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

गुढीपाडव्यानिमित्त उपमुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा

राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

 मराठी नववर्षाचा प्रारंभ असणाऱ्या गुढीपाडव्यानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जगभरातील मराठी बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या होत असलेल्या नुकसानाबद्दल चिंता व्यक्त करतानाच या संकटकाळात राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, गुढीपाडवा फक्त नव्या वर्षाचे स्वागत नाही तर नव्या संकल्पांचा सण आहे. नव्या विचारांची, नव्या कृतीची आणि नव्या स्फूर्तीची ऊर्जा देणारा सण आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून मराठी नववर्षाला सुरूवात होते. गुढी उभारून या नव्या वर्षाचे स्वागत करण्याची आपली परंपरा आहे. चैत्र महिन्यापासून निसर्गात होणाऱ्या चैतन्यदायी परिवर्तनाच्या स्वागताचाही उद्देश या उत्सवामागे आहे. आनंदाची गुढी उभी करतानाच बळीराजाच्या कल्याणाची भावना अतिशय महत्त्वपूर्ण आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळणार असून शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजनेचाही लाभ घेता येणार आहे. शेतकरी हिताचे निर्णय शासन घेत असून या कठीण काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे.