जायकवाडी धरणाची दुरुस्ती होणार:विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या सुचनेनंतर सरकारने दिली माहिती

मुंबई,१० मार्च  /प्रतिनिधी :-पैठण येथील जायकवाडी धरणाच्या दुरुस्तीचा प्रश्न निकाली काढावा, अशी सूचना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सभागृहात मांडली असता, सदर प्रकल्पाच्या कामाची निविदा अंतिम मान्यतेला गेली असून लवकरच कामाला सुरुवात होईल, अशी माहिती सरकारकडून देण्यात आली. 

धरणांचे पुनर्वसन आणि सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारने हाती घेतलेल्या ड्रीप योजनेत जायकवाडी धरणाचा समावेश आहे. ड्रीप योजनेत जायकवाडी धरण दुरूस्तीसाठी ८५ कोटी मंजूर केले. परंतु २ वर्षे झाली तरी निविदा प्रक्रिया सुरू झाली नसल्याचे दानवे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले.

धरणाच्या दुरुस्ती अभावी धरणाला चारे अंतर पडले, काही ठिकाणी कचरा साचला तर भिंती तुटल्या अशी धरणाची दयनीय अवस्था दानवे यांनी सभागृहात मांडली.

 त्यामुळे जायकवाडी धरणाच्या दुरुस्तीच्या कामाची निविदा काढण्याची मागणी दानवे यांनी केली. 

 या प्रकल्पासाठी जागतिक बँकेकडून रसद पुरवली जाणार आहे.  तसेच या प्रकल्पाची अंमलबजावणी जागतिक बँकेच्या निकषांनुसार होणार आहे. त्यामुळे विलंब झाल्याचे मान्य करत सदर प्रकल्पाची निविदा अंतिम मान्यतेसाठी गेली असून लवकरच जायकवाडी धरणाच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात होईल असे उत्तर देताना सरकारकडून सांगण्यात आले.