वाळूज, जोगेश्वरी, रामराई गावातील शेतकर्‍यांना दिलासा:सिडको महानगर-3 प्रकल्प रद्द करणार

‘त्या’ शेतकर्‍यांच्या जमिनीवरील आरक्षण उठवणार

आ.सतीश चव्हाण यांच्या लक्षवेधीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांची घोषणा

मुंबई,९ मार्च  /प्रतिनिधी :-वाळुज सिडको महानगर-3 करिता सिडको प्रशासनाने वाळुज, जोगेश्वरी, रामराई येथील शेतकर्‍यांच्या जमिनीवर टाकलेले आरक्षण पुढील अधिवेशनापूर्वी डिनोटीफाईड केल्या जाईल अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज (दि.9) विधान परिषदेत केली.

यासंदर्भात आ.सतीश चव्हाण यांनी विधान परिषदेत लक्षवेधी सूचना उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले. वाळुज सिडको महानगर-3 करिता सिडको प्रशासनाने वाळुज, जोगेश्वरी, रामराई येथील जवळपास 400 शेतकर्‍यांच्या 1250 एकर जमिनीवर सन 1989 मध्ये आरक्षण टाकले होते. मात्र मागील 34 वर्षात सिडको प्रशासनाने या नियोजित प्रकल्पाचा विकास करण्यासाठी काहीच कार्यवाही केली नाही. सिडकाने 18 फेब्रुवारी 2019 रोजीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत सदरील विषय घेवून वाळुज महानगर प्रकल्प-3 हे सिडको अधिसुचित क्षेत्रातून वगळण्यासाठी ठरावा केला असून हा ठराव शासन मान्यता अभावी प्रलंबित असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी सभागृहाचे निदर्शनास आणून दिले. सदरील बाधित शेतकर्‍यांची मागणी लक्षात घेता याठिकाणची जमिन डिनोटीफाईड करणार का?, किंवा सदरील जमिन शासन संपादित करणार का? असे प्रश्न उपस्थित करून यासंदर्भात आजच निर्णय जाहीर करावा अशी आग्रही मागणी आ.सतीश चव्हाण यांनी सभागृहात केली.

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या लक्षवेधीवर उत्तर देताना सदरील जमिन पुढच्या अधिवेशनापर्यंत डीनोटीफाईड केल्या जातील अशी घोषणा सभागृहात केली. यानिर्णयामुळे वाळूज, जोगेश्वरी, रामराई गावातील शेतकर्‍यांना दिलासा मिळणार आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील या चर्चेत सहभाग घेतला.