प्रकाश आंबेडकर म्हणतात, ‘आम्ही पुन्हा एकटे’

अकोला : उद्धव ठाकरेंचं चिन्ह गेलं, पक्षही हातातून गेला, आता नवा मित्रही पलटला अशी स्थीती निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे यांचं काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत मनोमिलन कायम राहिलं तर काय? असा प्रश्न आजच्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांना विचारला. त्यावर ‘तर आम्ही पुन्हा एकटे’ असं मोठं विधान त्यांनी केलं.

ते पुढे म्हणाले, उद्धव ठाकरेंसोबत आम्ही गेलोच होतो पण उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रेमात बुडालेले आहेत. राष्ट्रवादी किंवा काँग्रेस पक्षाकडून आम्हाला निमंत्रण आलेले नाही. त्यामुळे मग आम्ही पुढचा विचार का करु, अशापद्धतीने उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याबाबत नकाराचे संकेत प्रकाश आंबेडकरांनी दिले.

तसेच, एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरे या दोघांमधील भांडण सोडवायला मी जाणार नाही. ज्यांचे-ज्यांचे भांडण आहे त्यांनी-त्यांनी ते आपापसात बसून सोडवावे. मी शक्यतो अशा भांडणात पडत नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.