दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर १० मिनिटे वेळ वाढवून देण्याचा निर्णय 

मुंबई ,१५ फेब्रुवारी /प्रतिनिधी :-दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी माहिती दिली की, दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर १० मिनिटे वेळ वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील सुधारित वेळादेखील जाहिर करण्यात आल्या असून विद्यार्थ्यांचे हित आणि पालक, विद्यार्थ्यांनी केलेल्या मागणीवरून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारी पासून तर दहावीच्या परीक्षा २ मार्चपासून सुरु होत आहेत. यापूर्वी परीक्षेच्या १० मिनिटे आधी विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका देण्यात येत होती. मात्र, गैरप्रकार टाळण्यासाठी आणि पेपरफुटीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य मंडळाने नवीन नियमावली जाहीर केली होती. यामुळे १० मिनिटे वेळ वाढवून देण्याचा निर्णय हा विद्यार्थ्यांसाठी नक्कीच फायद्याचा ठरेल.