पुन्हा एकदा बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर ; शिंदे-फडणवीस सरकारला फटका बसू शकतो

पंढरपूर,३ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-विधानपरिषदेच्या निकालाचा विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीवर काहीही परिणाम होत नसला तरी मंत्रिमंडळ विस्तार न झाल्यास शिंदे-फडणवीस सरकारलाही असाच फटका बसू शकतो, असे प्रहार संघटनेचे अध्यक्ष व माजी मंत्री बच्चू कडू यांनी सांगितले, ते पंढरपुरात बोलत होते. शिक्षक आणि पदवीधर पदांसाठीचे मतदान सुमारे दोन लाख असल्याने विधानसभा किंवा लोकसभेच्या निकालावर त्याचा कोणताही परिणाम होत नाही. मात्र हे जरी खरे असले तरी राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्यामुळे सर्वच गोष्टी उलगडू लागल्या आहेत. लोकांमध्ये नाराजी असून याचा फटका सरकारला बसू शकतो, असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला.

या विधानसभा निवडणुकीत जुन्या पेन्शनचा मुद्दा ऐरणीवर आल्याने हे निकाल आले. हे मतदार संघटित असल्याने त्यांना आपला निकाल आणि ताकद दाखवता आली. मात्र, त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक असलेल्या असंघटित शेतकरी, शेतमजूर आणि कामगार वर्गाचे प्रश्न अधिक गंभीर आहेत. त्याकडे लक्ष दिले जात नसल्याचे कडू म्हणाले. राज्यात अनेक जिल्ह्यांचा एक पालकमंत्री आहे, एका मंत्र्याकडे अनेक खाती आहेत. तसेच अनेक जिल्ह्यांमध्ये एकच पालकमंत्री असल्याने लोकांची कामे होत नाहीत. अशावेळी मंत्रिमंडळाचा तातडीने विस्तार केल्यास जनतेचे प्रश्न सुटण्यास मदत होईल. मात्र अशीच परिस्थिती राहिल्यास या सरकारला जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला.