मुख्यमंत्री शिंदे संघाच्या कार्यालयात; उद्धव ठाकरे म्हणाले, ‘शिंदेंची नजर वाईट’

नागपूर ,२९ डिसेंबर/ प्रतिनिधी :- आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपुरातील रेशीमबाग राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या कार्यालयाला भेट देत त्यांनी डॉ. हेडगेवार यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन केले. भाजपवगळता कोणत्याही दुसऱ्या पक्षाचे मुख्यमंत्री संघाच्या नागपूर कार्यालयाला भेट देण्याची कदाचित ही पहिलीच वेळ होती. यावरून आता विरोधकांनी खासकरून शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.

मुंबई महानगरपालिकेतील शिवसेनेचे कार्यालय ताब्यात घेतल्यानंतर शिवसेना भवनावरही शिंदे गट ताबा घेणार अशी चर्चा सुरू झाल्याने बिथरलेल्या उद्धव ठाकरेंना आता जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिसत आहेत. इतकेच नव्हे तर त्यांनी आता थेट सरसंघचालक मोहन भागवत यांनाही आरएसएसच्या कार्यालयात लिंबू शोधण्याचा सल्ला दिला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज देवेंद्र फडणवीसांसमवेत नागपुरातील आरएसएसच्या कार्यालयाला भेट दिली. यावर पत्रकार परिषदेत बोलताना ठाकरे म्हणाले की, “आज ते (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे) आरएसएस कार्यालयातून बाहेर पडले असावेत. पण मोहन भागवतांना मी विचारतोय की कार्यालयाचा कोपरान् कोपरा तपासून बघा. कुठे लिंब टाकलेत का तेही बघून घ्या. कदाचित आज आरएसएसच्या कार्यालयातही ते ताबा घेण्यासाठीच गेले असतील.”

“यांची नजर फार वाईट आहे, याचा आम्ही अनुभव घेतला आहे. जे काही चांगलं असेल, ते आपण नाही करू शकत तर त्याचा कब्जा कसा घ्यायचा ही त्यांची वृत्ती आहे. त्यामुळे आरएसएसनेही यावर काळजी घेण्याची गरज आहे. कुठेही जायचे आणि ते बळकवायचा प्रयत्न करायचा. जणूकाही महाराष्ट्रात टोळ्यांचं राज्य आलंय की काय अशी भावना सामान्यांमध्ये यायला लागली आहे. काल त्यांनी आमच्या पालिकेतल्या कार्यालयाचा ताबा घ्यायचा प्रयत्न केला. आज ते आरएसएसच्या कार्यालयात गेले होते. आरएसएस मजबूत आहे म्हणून ते ताबा घेऊ शकले नसतील. पण आरएसएसनं काळजी घ्यायची गरज आहे”, असा टोला उद्धव ठाकरेंनी यावेळी लगावला.

पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची पत्रकार परिषद त्यांच्याच शब्दांत 

नेमक्या ठोस योजना या सरकारकडून अद्याप विदर्भासाठी जाहीर झालेल्या नाहीत. दीड दिवस आहे सरकारकडून अपेक्षा. विदर्भाने स्वागत केले पण तुम्ही विदर्भवासियांची भावना लक्षात घेऊन ठोस अंमलबजावणी होईल अश्या योजना जाहीर करा. अर्थसंकल्प झाल्यावरच पुरवणी मागण्यांच्या बाबतीत स्पष्टता येईल. एनायटी घोटाळा, सत्तार, उदय सामंत सगळ्यांच्या घोटाळ्याबद्दल सरकार काय करणार हे जाहीर करावे, उत्तर द्यावे.

शेतकरी, महागाई सारखे विषय बोलत नाही. 

आज रा.स्व संघाच्या कार्यालयात ताबा घेण्यासाठी गेले होते का?  जे काही करु शकत नाही ते चोरी करतात अथवा ताबा घेतात, पक्ष चोरायचा, नेते चोरायचे. हा मानसोपचारतज्ज्ञांना विचारण्याचा प्रश्न. संघ कार्यालयातून  आता बाहेर पडले असतील. पण कुठे लिंबू, टाचण्या पडल्यात का ते बघावे. रा.स्व संघाने पण आता काळजी घ्यावी. महाराष्ट्रात टोळीचे राज्य आलेले आहे अशी जनभावना आहे. पत्रकाराला प्रश्न तुमच्यावर खोटे आरोप झाले आत्महत्येचे तर तुम्ही स्पष्टीकरण देत बसणार आहात का जिथे तुमचा काहीच संबंध नाही? आम्ही प्रश्न मांडतोय पण सरकार उत्तर देत नाही. काल भाजपचे कर्नाटकचे मंत्री म्हणाले मुंबई केंद्रशासित करा, हा भाजपचा डाव काल बाहेर आला. कर्नाटक सरकार सर्व स्तरावर मराठी बांधवांवर अत्याचार करतय. माझी विनंती पुनर्विचार याचिका दाखल करावी आणि निकाल येईस्तोवर जैसे थे परिस्थिती कायम ठेवावी.

ठराव हा महाराष्ट्राच्या वतीने आहे. आम्हाला जे सुचवायचे ते सुचवले. महाराष्ट्रासाठी आम्ही ठरावाला पाठिंबा दिला. ही प्रकरणे बाहेर कुठून येताहेत हा त्यांनी विचार करावा. माझा त्यावेळेला पण माझा पाठिंबा नव्हता तेव्हा आरोप झाले मी त्या मंत्र्याला काढले हे तुम्हाला माहिती आहे. महापुरुषांचा अपमान करणारी व्यक्ती संवैधानिक पदावर कशी असू शकते. अमित शहांनी राज्यपालांच्या पत्राला काय उत्तर दिले ते कळले नाही.

तिन्ही ठिकाणी भाजपची सरकार आहेत. जर कर्नाटकचे मुख्यमंत्री आक्रमकणे बोलतात. हा भाजपचा डाव आहे. मुंबई ताब्यात आम्ही घेऊ देणार नाही. विदर्भाचा वेगळे होण्याचा मुद्दा हा विकासाशी संबंधित आहे. मी पत्रकार परिषद सुरु करतांनाच विदर्भाला काय देणार इथूनच सुरुवात केली. मी मुख्यमंत्री असताना मिहानला, गोसीखुर्दला गेलो. यांच्या काळात उद्योग पळाले. मी शिवसेनाप्रमुखांचेच स्वप्न पूर्ण करत होतो.