ग्रामपंचायत निवडणूक निकालाला गालबोट; जळगावमध्ये दगडफेकीत एकाचा मृत्यू

जळगाव ,२० डिसेंबर /प्रतिनिधी :- एकीकडे विजयाचा गुलाल उधळत असताना दुसरीकडे हा दिवस जळगावमधील एका गावासाठी काळा  दिवस ठरला. जामनेर तालुक्यातील टाकळी गावात ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर दोन गटांमधील कार्यकर्ते आपसात भिडले. यावेळी दोन समुहांकडून दगडफेक देखील करण्यात आली. यामध्ये एका भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. यामुळे ग्रामपंचायत निवडणूक निकालाला गालबोट लागले आहे.

जळगाव मधील जामनेर तालुक्यात टाकळी खुर्द या गावात ग्रामपंचायत निवडणुकीत विजय झाल्यानंतर देवाच्या दर्शनासाठी जात असताना अचानक झालेल्या दगडफेकीत एका भाजपच्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. धनराज श्रीराम माळी (वय ३२) असे या निधन झालेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे.पराभूत झालेल्या झालेल्या पॅनलच्या कार्यकर्त्यांनी ही दगडफेक केली व त्या दगडफेकीत धनराज माळी याचा मृत्यू झाल्याचा आरोप धनराज माळी यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.कार्यकर्त्यांनी त्याला सरकारी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूची बातमी कळताच रुग्णालयातच इतर कार्यकर्त्यांनी आणि नातेवाईकांनी टाहो फोडला.