जितेंद्र आव्हाडांना अटक करणाऱ्या डीसीपींची बदली!

ठाणे , १३ नोव्हेंबर /प्रतिनिधी :-विवियाना मॉल मारहाण प्रकरणात ठाणे पोलिसांनी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना अटक केली होती. त्यानंतर त्यांची ठाणे कोर्टाकडून जामिनावर सुटकादेखील करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर लगेचच त्यांना अटक करणाऱ्या डीसीपींची बदली करण्यात आल्याची बातमी समोर आली.

मिळालेल्या माहितीनुसार, डीसीपी विनयकुमार राठोड यांची परिमंडळ ५ मधून वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे. विशेष म्हणजे जितेंद्र आव्हाडांनी जामीन मिळाल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत डीसीपी विनयकुमार राठोड यांचे नाव घेत आपल्या अटकेसाठी त्यांच्यावर प्रचंड दबाव होता, असं म्हटले होते. विनयकुमार राठोड यांची अशी अचानक तडकाफडकी बदली करण्यात आल्यामुळे अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

पत्रकार परिषदेमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी म्हंटले होते की, “ठाण्याच्या वर्तक नगरच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा या प्रकरणाशी शून्य संबंध आहे. त्यांची हतबलता मला प्रत्येक मिनिटाला समजत होती. त्यांच्या डोळ्यांमधून फक्त अश्रू येणं बाकी होतं. बाकी सगळे हतबल होते. कारण असं कुणाला अटक करत नाही.”