युवक महोत्सवातील विडबंन कलाप्रकारातून ‘समंद ओके मदी हाय’ 

नांदेड ,१० ऑक्टोबर  /प्रतिनिधी :- राष्ट्रचेतना-२०२२ आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवातील विडंबन या कलाप्रकारातून स्पर्धकांनी सद्याच्या राजकीय परिस्थितीवर विडंबन सादर करीत  ‘समंद ओके मदी हाय’ ही असी हाक दिली. प्रेक्षकांना विडंबन कला प्रकाराने खळखळून हसविले. 

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पस यांच्या संयुक्त विद्यमाने आंतर महाविद्यालय “राष्ट्रचेतना” युवक महोत्सव २०२२च्या जयवंत दळवी मंच क्र. २वर विडंबन हा कला प्रकार सादर झाला. सलीम फेकूबाबा हे विडंबन सर्व प्रथम सादर झाले.

कोरोना काळातील विद्यार्थी अभ्यासापासून दुरावत जाऊन तो मोबाईलच्या आहारी गेला याचे विडंबन ‘शाळा’ या विडंबनातून सादर झाले. 

‘घंटी वाजली, शाळा सुटली, आत्ता मोबाईलवर अभ्यास कर’ विद्यार्थी पुस्तकातला अभ्यास न करता मोबाईलवरील फ्री फायर, पब्जी सारखे खेळ खेळू लागला. याच विडंबनातून लहान मुलांनी बंडखोर, ईडी सारखे प्रश्न पुढे आणले. या कलाप्रकारात मंजू खिस्ते, राम साखरवाड, अमोल पवार, विकास दळवी, समर्थ भालेराव, मीरा निवाळी आदी स्पर्धकांनी भाग घेतला. 

तमाशा या विडंबनात पूर्वीचे  सरकार जाऊन नवीन सरकार अस्तित्वात येऊन कसा तमाशा झाला, याची प्रचिती या विडंबनातून आली. यामध्ये ऐश्वर्या डावरे, वैष्णवी मुळी, गोयल साखरे, साक्षी सहजराव, संकेत गाडेकर, शुभम गोधडे, आदींनी भाग घेतला.

‘रुसला गं, बाई रुसला, मला सोडून दुसऱ्या गटात घुसला’ या भिकारी सुशिक्षित बेरोजगार या विडंबनातून प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावले. 

भारतातील दारिद्र, बेकारी, बेरोजगारी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्ष साजरे होत असतांनाही संपलेले नाही हे वास्तव चित्र, आंदोलन या विनोदी नाटकातून प्रथमेश मोरे, बालाजी कांबळे, खंडू येडे, वर्षा ससाणे, वैष्णवी आंधळे, दिव्या धोटे, यांनी दाखवून दिले. 

मंचावर सल्लागार समितीचे डॉ. प्रताप देशमुख, डॉ. व्यंकटी पावडे, डॉ. गोविंद रामदिनेवर, मनीष देशपांडे आदींची उपस्थिती होती.   

युवक महोत्सवातील मराठी एकांकिकेतून अंधश्रद्धा निर्मूलनाचा नारा     

“राष्ट्रचेतना” युवक महोत्सव २०२२च्या जयवंत दळवी मंच क्र. २वर मराठी एकांकिका कलाप्रकाराला प्रेक्षकांची मोठी गर्दी झाली होती. मराठी एकांकिकेतून बेरोजगारी, अंधश्रद्धा आणि आजचा युवक कसा बदलत चालला आहे यावर परखड संवाद सादला. 

नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय, नांदेडच्या स्पर्धकांनी भुकेचा आक्रांत ही एकांकिका सादर करीत अंधश्रद्धा किती वाढत आहे, हे दाखवून दिले. नदीवर पूल बांधतांना त्यासाठी प्राणी, मानव याचा बळी द्यावा लागतो. ही बाब त्यांनी या एकांकिकेतून दाखवून दिली. या एकांकिकेत अदिती केंद्रे, रुद्र शर्मा, प्रबोध कौठेकर, प्रांजली गुडमलवार, ओमजय पुयड, अखिलेश पांचाळ, अमोल केने, हनुमंत बनसोडे, रोहित जांगीड, या कलावंतांनी भूमिका घेतली. 

शिवप्रसाद कॉलेज ऑफ फार्मसी, मुखेडच्या नाट्य कलावंतांनी नाथा चितळे लिखित प्रश्न प्रश्नाच्या अंधारात ही एकांकिका सादर केली. या एकांकिकेतून आजचा युवक आळसी होऊन बुवाबाजी आणि अंधश्रद्धांच्या मागे कसा लागला आहे याचे ज्वलंत चित्रण एकांकिकेच्या माध्यमातून पुढे आणले.

या एकांकिकेत दीपक घोडके, युवराज शिनगारे, सविता भेंडे, पल्लवी तेलंगे, शुभांगी मरशिवनीकर, प्रतिज्ञा स्वामी, पंकज लंके, सारिका देवकत्ते आदींनी सहभाग घेतला. युवक महोत्सवात स्पर्धक कलावंतांनी सामाजिक, राजकीय घडामोडीवर भाष्य करणारे एकाहून एक सरस एकांकिका सादर करत प्रेक्षकांना खिळवून ठेवले.