महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार

५ सप्टेंबर रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते होणार पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली,२९ऑगस्ट  /प्रतिनिधी :- महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना अध्यापन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी वर्ष २०२२ चे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाले आहेत. येत्या ५ सप्टेंबर रोजी शिक्षकदिनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येतील.

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्याच्या दामु नाईक तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक शशिकांत कुलथे आणि याच जिल्ह्यातील पारगाव जोगेश्वरी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे शिक्षक सोमनाथ बाळके यांना तसेच, मुंबईतील छत्रभूज नरसी मेमोरियल स्कूलच्या मुख्याध्यापक कविता संघवी यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाले आहेत.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नुकतेच वर्ष २०२२ च्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांची घोषणा केली आहे. देशातील एकूण ४६ शिक्षकांना हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला असून महाराष्ट्रातील तीन शिक्षकांचा यात समावेश आहे. येत्या ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाच्या औचित्याने येथील विज्ञान भवनात राष्ट्रपतींच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांच्या विजेत्यांमध्ये स्थान पटकावणाऱ्या राज्यातील तीन शिक्षकांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.

बीड जिल्ह्यातील दामुनाईकतांडा (ता. गेवराई) येथील जिल्हा परिषद शिक्षक शशिकांत कुलथे, याच जिल्ह्यातील पारगाव जोगेश्वरी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे शिक्षक सोमनाथ बाळके तसेच, मुंबईतील छत्रभूज नरसी मेमोरियल स्कुलच्या मुख्याध्यापक कविता संघवी यांनी वर्ष २०२२साठीचे हे पुरस्कार पटकावले आहे.

‘या शिक्षकांची कामगिरी राज्याच्या शैक्षणिक वाटचालीचा गौरव वाढविणारी आहे. या तिघांचे हे यश इतरांसाठी प्रेरणादायी आणि प्रोत्साहन ठरेल. यासाठी या सर्वांचा अभिमान आहे. तिघांचेही अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा’ असे मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.