महाराष्ट्र-अमेरीका दरम्यान व्यापाराच्या व गुंतवणुकीच्या विविध संधी खुल्या होतील – रणधीर जायस्वाल

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे अमेरीकेत व्यापार परिषद

मुंबई ,२७ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- भारत हा वेगाने विकसित होत असलेला देश असुन भारताची अर्थव्यवस्था मजबुत असल्याने जगभरातील देश भारतात येऊ इच्छितात. ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’ ने अमेरीकेत व्यापार परिषदेचे आयोजन करून महाराष्ट्राला ज्या पध्दतीने सादर केले आहे ते पाहता महाराष्ट्र व अमेरीके दरम्यान गुंतवणुकीच्या नवीन संधी खुल्या होतील असा विश्‍वास भारताचे न्युयॉर्क मधील कॉन्सुलेट जनरल रणधीर जायस्वाल यांनी व्यक्त केला.
‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर’ व बृहन्महाराष्ट्र मंडळ अमेरीका यांच्या संयुक्त विद्यमाने अमेरीकेतील अटलांटीक सिटी, न्यु जर्सी येथे बिझनेस समीट चे आयोजन करण्यात आले होते, सदर समीटच्या उद्घाटनप्रसंगी जायस्वाल बोलत होते.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष ललित गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या परिषदेत बृहन्महाराष्ट्र मंडळच्या अध्यक्ष विद्या जोशी, बिझनेस समीटचे निमंत्रक आनंद चौथाई, नारीशक्ती पुरस्कार विजेत्या श्रीमती रूमादेवी, पर्सिस्टंट कंपनीचे प्रमुख आनंद देशपांडे, विकास बावधनकर, नरेन गोडसे, नवीन पाठक, चेंबरचे वरीष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी व्यासपीठावर उपस्थित होते.
बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्ष श्रीमती विद्या जोशी यांनी बिझनेस समीट चे आयोजन हा महत्वपूर्ण निर्णय असुन भविष्यात या उपक्रमामुळे महाराष्ट्राशी आमचे ॠणानुबंध अजुनही दृढ होतील असा विश्‍वास व्यक्त केला.
बिझनेस समीटचे निमंत्रक आनंद चौथाई यांनी बृहन्महाराष्ट्र मंडळाने या आयोजनासाठी केलेल्या आवाहनास महाराष्ट्र चेंबर ने सकारात्मक प्रतिसाद देऊन हे आयोजन यशस्वी केले याचा अमेरीकेतील महाराष्ट्रीयन समुहास अभिमान आहे असे सांगितले.

‘ग्लोबल महाराष्ट्र फोरम’ च्या बोधचिन्हाचे अनावरण करताना कॉन्सुलेट जनरल रणधीर जायस्वाल, चेंबर चे अध्यक्ष ललित गांधी


महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासातील महाराष्ट्र चेंबरच्या योगदानाची माहीती देऊन महाराष्ट्र हे भारतातील आघाडीचे औद्योगिक राज्य असुन गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण व उत्तम बाजारपेठ, कुशल मनुष्यबळ उपलब्ध असणारे राज्य असुन व्यापारात संयुक्त उपक्र मांसाठी व नवीन गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र सर्वात उत्तम पर्याय असल्याचे आग्रहपूर्वक नमुद केले.
चेंबरचे वरीष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी यांनी महाराष्ट्राचे विभागवार वैशिष्ट्यासह प्रभावी सादरीकरण केले.पर्सिस्टंटचे आनंद देशपांडे, श्रीमती रूमादेवी यांनीही शुभेच्छा व्यक्त केल्या.
कॉन्सुलेट जनरल रणधीर जायस्वाल यांनी महाराष्ट्रात नवीन गुंतवणुकीसाठी तसेच महाराष्ट्र चेंबर तर्फे येणार्‍या प्रस्तावांच्या स्विकृतीसाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
महाराष्ट्र चेंबर तर्फे जगभरातील विविध देशात राहणार्‍या महाराष्ट्रीयन लोकांच्या संघटनांचे एक सामुहीक व्यासपीठ ‘ग्लोबल महाराष्ट्र फोरम’ या नावाने गठीत केल्याची घोषणा ललित गांधी यांनी केली. या फोरम चे औपचारीक ‘उद्घाटन’ कॉन्सुलेट जनरल रणधीर जायस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले.
बृहन्महाराष्ट्र मंडळातर्फे आयोजित विविध उपक्रमांना  अमेरीकेतील विविध राज्यातुन आलेलया 5000 हून अधिक मान्यवरांनी सहभाग घेतला. यावेळी महाराष्ट्रात गुंतवणुकीचा विविध प्रस्तांवावर चर्चा करण्यात आल्या व विविध उद्योजकांच्या समुह बैठका झाल्या.
याप्रसंगी दिपक शिकापूर, प्रवीण पाटील, शेखर चिटणीस, विनित पोळ, नितिन इंगळे, श्‍वेता इनामदार, प्रज्ञा पोंक्षे, भाऊसाहेब कालवाघे, रविराज अहिरराव, संजीव तांभोरकर यांनी बैठकांमध्ये सहभाग घेतला.