पत्राचाळ घोटाळा प्रकरणी राऊतांच्या कोठडीत ५ सप्टेंबरपर्यंत वाढ

मुंबई : पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना ५ सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे. संजय राऊत सध्या आर्थर रोड कारागृहात आहेत.

गोरेगाव पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने संजय राऊतांना एक ऑगस्टला नऊ तासांच्या चौकशीनंतर अटक केली होती. त्यानंतर दोन वेळा जामीन नाकारत ईडीने त्यांची कोठडी कायम ठेवली. आज पुन्हा एकदा कोर्टात झालेल्या सुनावणीनंतर ५ सप्टेंबरपर्यंत त्यांची कोठडी कायम ठेवण्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

पत्राचाळ जमीन घोटाळा हा १,०३४ कोटी रुपयांचा आहे. ईडीच्या आरोपानुसार, गोरेगावातल्या पत्राचाळीत म्हाडाचा भूखंड आहे. प्रवीण राऊतांची कंपनी गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला ही चाळ विकसित करण्याचे काम देण्यात आले होते. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी विकासकांना विकला. पुनर्विकासासाठी ही जागा राऊतांच्या कंपनीला दिली होती. मात्र त्याचा काहीच पुनर्विकास झाला नाही, उलट या जागी बांधलेली घरे काही व्यावसायिकांना वाटून देण्यात आली आणि त्यातून राऊतांनी तब्बल १,०७४ कोटी रुपये जमवले.

त्यानंतर हे पैसे प्रवीण राऊत यांनी त्यांचे मित्र आणि निकटवर्तीयांच्या खात्यात वळते केले. यातले ८३ लाख रुपये प्रवीण यांच्या पत्नी माधुरी यांनी संजय राऊतांच्या पत्नी वर्षा यांच्या खात्यात जमा केले. त्याच रकमेतून वर्षा राऊत यांनी दादरमध्ये फ्लॅट घेतल्याचा आरोप केला आहे.