राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट; शहिदांना श्रद्धांजली


नवी दिल्ली
,१८ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथील इंडिया गेट परिसरातील राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या वीर जवानांना श्रद्धांजली वाहिली.

याप्रसंगी एअर कोमोडोर सुनिल तोमर यांनी राज्यपालांचे स्वागत केले. सचिव तथा महाराष्ट्र सदनाच्या प्रभारी निवासी आयुक्त डॉ. निधी पांडे आणि भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या केंद्रस्थानी स्थित ‘अमर जवान ज्योतीला’ पुष्पचक्र अर्पण करून भारत देशाच्या रक्षणासाठी शहीद वीर जवानांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी राज्यपाल आपल्या संदेशात म्हणाले की, 1962 च्या भारत – चीन युद्धात शहीद झालेल्या आपल्या बहिणीच्या पतीची (भाऊजी) प्रकर्षाने आठवण झाली. शहिदांच्या कुटुंबियांच्या  दु:खाप्रती  सद्भाव  व्यक्त करतानाच त्यांच्या कुटुंबाविषयी गर्व वाटतो. देशासाठी युद्धभूमीवर शहीद झालेल्या वीर जवानांचा देशाला गर्व असून ‘राष्ट्रीय युद्ध स्मारक’ हे पाचवे धाम म्हणून देशाच्या तरुणांसाठी प्रेरणास्त्रोत ठरेल, असेही राज्यपालांनी संदेशात म्हटले आहे.

दरम्यान, राज्यपालांनी बुधवारी (दि. 17 ऑगस्ट) नवनियुक्त उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांची उपराष्ट्रपती निवास येथे सदिच्छा भेट घेतली. तसेच, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची 12, जनपथ या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.