द्रौपदी मुर्मू यांच्या निवडीने महिला सबलीकरणाचा गौरव – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा जीवनसंघर्ष भारतीयांसाठी प्रेरणादायी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विधिमंडळ अधिवेशनात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव संमत

मुंबई ,१८ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- भारताने नेहमीच महिला सबलीकरणासाठी पहिले पाऊल टाकून जगासमोर आदर्श ठेवला आहे. याच परंपरेचा गौरव आणि अभिमान म्हणून राष्ट्रपतीपदी श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची निवड ओळखली जाईल. आदिवासी समाजातून येऊनही उच्चशिक्षित आणि समाजकारणात अग्रभागी राहिलेले नेतृत्व म्हणून श्रीमती मुर्मू यांची ओळख आहे. त्यांच्या निवडीने आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी आणि त्यातील विविध घटकांना विकासाच्या प्रवाहात सामावून घेण्याच्या प्रक्रियेला मोठा हातभार लागणार आहे. असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.

श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपतीपदी आणि श्री.जगदीप धनखड यांची उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला.

विधिमंडळ अधिवेशनात मुख्यमंत्री श्री. शिंदे अभिनंदन प्रस्तावावर भाषण करताना म्हणाले, अतिशय विपरीत परिस्थितीत संघर्ष करीत राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचलेल्या श्रीमती द्रौपदी मुर्मू या आम्हा सर्वांसाठी आदर्श आहेत. त्यांचा जीवन संघर्ष आणि संकटांवर मात करण्याची इच्छाशक्ती ही आज अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी जाहीर झाल्यावर त्या मुंबईला आल्या होत्या तेव्हा मी त्यांना पहिल्यांदा प्रत्यक्ष भेटलो. नंतर त्यांच्या शपथविधीला उपस्थित राहण्याची संधीही मिळाली. त्या राष्ट्रपती होणार होत्या, पण कमालीची विनम्रता, आणि आपण ज्या समाजातून आलो आहोत, त्यांचं देणं असल्याची भावना त्यांच्यात असलेली पाहून मी भारावून गेलो.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, खरोखरच देशाच्या 15 व्या राष्ट्रपती म्हणून त्यांचा कार्यकाळ अभिमानास्पद ठरेल यात तिळमात्र शंका नाही. मला महिला आणि पुरुष असा भेद करायचा नाही, तुलनाही करायची नाही. 21 व्या शतकात झेप घेणारा आपला देश आहे. आज महिला कोणत्या क्षेत्रात आघाडीवर नाहीत ? सामाजिक, राजकीय, क्रीडा, संशोधन, आरोग्य, शेती, व्यवसाय, लष्कराची तीनही दले, प्रशासन या सर्व क्षेत्रात महिलांनी आपली शक्ती सिद्ध केली आहे. श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या रूपाने तर यावर कळस चढला आहे. भारताची मान अभिमानाने जगात उंचावली आहे. ही आपल्या लोकशाहीची शक्ती आहे असा संदेश जगात गेला आहे.

देशातल्या समस्त गरीब, दुर्बल आणि मागास जनतेला जणू हे सर्वोच्च पद आज मिळालं आहे. श्रीमती मुर्मू यांनी शपथ घेतल्यानंतर आपल्या पहिल्याच भाषणाची सुरुवात ” जोहार” असं म्हणून केली. हा केवळ अभिवादनपर शब्द नाही तर आदिवासी समाजात निसर्गाला धन्यवाद देतानाचा तो उल्लेख आहे. निसर्गाला समर्पित भावनेने अतिशय आदराने केलेला तो उल्लेख आहे.

राष्ट्रपतीपदावर असले, तरी माझे पाय मातीचेच आहेत, आणि गोरगरीब आदिवासी आणि त्यांची संस्कृती हीच माझ्यात सामावलेली आहे हे श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी दाखवून दिलं. जगातल्या सर्वात सुंदर अशा निवडक प्रासादात (वास्तूमध्ये ) जिचा समावेश होतो त्या भव्य राष्ट्रपती भवनात आमची आदिवासी कन्या राहते आहे, ही कल्पनाच मुळात अतिशय रोमांचकारी आहे.

देशातील सर्व पक्ष, संघटना, संस्था यांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला पण विशेषत: देश विदेशातील बड्या राष्ट्रप्रमुख यांनी त्यांचे अभिनंदन करताना व्यक्त केलेल्या भावना खूप महत्त्वाच्या वाटतात. मनुष्य त्याच्या परिश्रम आणि मेहनतीने आपल्या जीवनात उंची गाठतो, तो कुठल्या जाती, धर्माचा आहे यावर काही ठरत नाही, हा संदेश सर्वदूर गेला. वैयक्तिक आयुष्यातील संघर्षानंतरही,  निस्वार्थ भावनेने समाजाच्या सेवेत, द्रौपदी मुर्मू यांनी स्वत:ला वाहून घेतले, ही बाब तर आपणा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. या सकारात्मकतेचे मूर्तिमंत उदाहरण आहे.

श्रीमती द्रौपदी मुर्मू यांचा जन्म 20 जून 1958 रोजी ओडिशा राज्यातील मयुरभंज जिल्ह्यात दापोसी गावात एका आदिवासी कुटुंबात झाला. आदिवासी आणि त्यातही महिला असूनही शिक्षण हेच त्यांनी आपल्या आयुष्याचे ध्येय ठेवले. भुवनेश्वर येथे रमादेवी महिला महाविद्यालयातून त्यांनी कला शाखेची पदवी संपादन केली. विद्युत विभागात कनिष्ठ सहायक म्हणून काम केले. नंतर काही काळ त्या शिक्षिकाही होत्या. याचवेळी त्यांनी आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी  काम सुरु केलं.

श्रीमती मुर्मू या 1997 मध्ये रायरंगपूर नगरपंचायतीच्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या. त्यानंतर 2000 व सन 2004 मध्ये त्या रायरंगपूर विधानसभा मतदारसंघातून ओडिशा विधानसभेवर निर्वाचित झाल्या. त्यांनी ओडिशा सरकारमध्ये वाणिज्य आणि वाहतूक, मत्स्य व्यवसाय व पशुसंवर्धन राज्यमंत्री म्हणूनही उत्तम कामगिरी बजावली. 2007 मध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट आमदार म्हणून ‘निलकंठ’ पुरस्काराने ओडिशा विधानसभेने गौरविले. त्यानंतर ते 2015 ते 2021 या कालावधीत झारखंडचे राज्यपाल म्हणून त्यांनी काम पाहिले. राष्ट्रपतीपदावर श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची झालेली निवड आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद अशीच आहे.

श्रीमती मुर्मू आपल्या पदाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा गौरव वाढवण्यासाठी आणि बलशाली प्रजासत्ताक निर्मितीसाठी महत्वाचे योगदान देतील, हा दृढ विश्वास आहे. त्यांची निवड हा मनामनात प्रखर राष्ट्राभिमान जागृत करणारा क्षण आहे. या निवडीसाठी श्रीमती मुर्मू यांचे मनापासून अभिनंदन आणि त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी आदरपूर्वक शुभेच्छा‌.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत मांडला

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, नवनियुक्त उपराष्ट्रपती श्री. जगदीप धनखड यांचे देखील मी मनापासून अभिनंदन करतो. राजस्थानमधील झुनझुनु जिल्ह्यातील किठाना गावात एका शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. चित्तौडगड येथील सैनिकी शाळेतून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी भौतिकशास्त्र या विषयात पदवी संपादन केली. नंतर त्यांनी राजस्थान विद्यापीठातून कायद्याची पदवी प्राप्त केली.

श्री. धनखड यांनी सुरुवातीस काही काळ राजस्थान उच्च न्यायालयात वकिली केली. सर्वोच्च न्यायालयातही वकिली केली. राजस्थान उच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनचे ते अध्यक्ष होते. श्री. धनखड यांनी सन १९८९ मध्ये राजकारणात प्रवेश केला. ते १९८९ मध्ये राजस्थानातील झुनझुनु मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. एप्रिल १९९० ते नोव्हेंबर १९९० या कालावधीत त्यांनी केंद्रीय संसदीय कामकाज राज्यमंत्री म्हणून उत्तम कार्य केले. त्यांनी १९९३ ते १९९८ या कालावधीत राजस्थानातील अजमेर जिल्ह्यातील किसनगंज विधानसभा मतदारसंघाचेही प्रतिनिधीत्व केले होते. श्री. धनखड हे जुलै, २०१९ पासून पश्चिम बंगाल राज्याचे राज्यपाल होते.

अशा या संसदीय कामकाजाचा दांडगा अनुभव असलेल्या संसदपटूची भारताच्या उपराष्ट्रपतीपदी निवड झाली आहे. त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा जीवनसंघर्ष भारतीयांसाठी प्रेरणादायी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भारतासारख्या खंडप्राय देशाच्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांचा जीवनप्रवास थक्क  करणारा आहे. विशेषतः सर्वच स्त्रियांना द्रौपदी मुर्मू यांचा जीवनसंघर्ष भावूक करणारा व प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देणारा आहे. सामान्य माणसाला अभिमान वाटावा असाच त्यांचा जीवनप्रवास असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले. विधानपरिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. अभिनंदनाचा हा प्रस्ताव विधानपरिषदेत एकमताने संमत करण्यात आला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, श्रीमती द्रौपदी मुर्मू हे एक जिद्दी आणि समर्पित व्यक्तिमत्वाचे नाव आहे. भारतासारख्या खंडप्राय देशाच्या राष्ट्रपतिपदी त्यांची नियुक्ती ही सर्वांसाठी अभिमानास्पद आहे. ओडिशा राज्यातील मयुरभंज जिल्ह्यातील बैदापोसी या छोट्याशा गावात  एका अत्यंत सामान्य आदिवासी कुटुंबात त्यांचा जन्म 20 जून 1958 रोजी झाला. भुवनेश्वर येथे रमादेवी महाविद्यालयातून 1979 मध्ये  त्या कला शाखेतून पदवीधर झाल्या. ओडिशा सरकारच्या सिंचन खात्यातही त्यांनी सेवा केली. पुढे त्या शिक्षक झाल्या. त्या 1997 मध्ये रायरंगपूर नगर पंचायतीच्या नगरसेवक म्हणून निवडून आल्या.

द्रौपदी मुर्मू ओडिशाच्या माजी मंत्री असून 2000-2004 आणि 2004-2009 मध्ये रायरंगपूर विधानसभा मतदारसंघातील आमदार होत्या. ओडिशातील भारतीय जनता पक्ष आणि बिजू जनता दल यांच्या युती सरकारच्या काळात, त्या 6 मार्च 2000 ते 6 ऑगस्ट 2002 पर्यंत वाणिज्य आणि वाहतूक राज्यमंत्री आणि 6 ऑगस्ट 2002 ते 16 मे 2004 या कालावधीत मत्स्यव्यवसाय आणि पशु संसाधन विकास राज्यमंत्री होत्या. 2007 मध्ये ओडिशा विधानसभेतर्फे सर्वोत्तम आमदारांना दिल्या जाणाऱ्या नीलकंठ पुरस्काराने गौरवण्यात आले. 20 वर्षाच्या दांडग्या अनुभवासह त्यांनी आदिवासींच्या सक्षमीकरणसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. 64 वर्षांच्या द्रौपदी मुर्मू या झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या. दलित, आदिवासी,लहान मुले यांच्या उत्थानासाठी  झटणाऱ्या द्रौपदी मुर्मू यांची  वैयक्तिक जीवनात अनेक संकटामुळे अक्षरशः होरपळ झाली. वैयक्तिक आयुष्यात आलेल्या संकटांनाही त्यांनी धीराने तोंड दिले. त्यांनी दलित,आदिवासी यांच्या सेवेत स्वतःला झोकून दिले.

2015 मध्ये झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून पाच वर्षे काम केले. विनम्र स्वभावाच्या कठोर प्रशासक म्हणून त्यांचा लौकिक झाला. विनम्रता, वाणीत गोडवा आणि सर्वांना सन्मान देण्याच्या वृत्तीमुळे त्या नेहमीच पालकाच्या भूमिकेत असतात. 2021  पर्यंत त्या राज्यपाल होत्या. एक सामान्य शिक्षिका भारताची राष्ट्रपती होणे हे भारतीय लोकशाहीचे नितांत सुंदर व विलोभनीय रुप आहे, त्यांचा हा प्रवास प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देणारा असल्याचे उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यावेळी म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची उपराष्ट्रपतिपदी झालेली निवड ही शेतकरी सुपुत्राचा सन्मान आहे. ते राजस्थानच्या झुंझुनूच्या किथाना गावचे आहेत. या गावाशी आजही त्यांचे नाते घट्ट आहे.

फार्महाऊसमध्ये श्री. धनखड यांनी त्यांच्या गावातील महिलांसाठी शिवणकाम प्रशिक्षण केंद्र उघडले, मुलांसाठी इंग्लिश स्पीकिंग क्लासेस सुरु केले, संगणक अभ्यासक्रमही सुरु केलेत. इंग्रजीत बोलणारे धनखड हे गावातील पहिले व्यक्ती होते. त्यांची इच्छा आहे की गावातील प्रत्येक मुलगा उत्तम इंग्रजी बोलला पाहिजे. याच विचारातून त्यांनी काही वर्षांपूर्वी स्पोकन इंग्लिशचे वर्ग आणि संगणक प्रशिक्षण केंद्र सुरू केले. एक वाचनालयही बांधले, जिथे सर्व प्रकारच्या पुस्तकांचा संग्रह आहे. गेल्या 15 वर्षात  2500  हून अधिक महिलांना येथे मोफत प्रशिक्षण देण्यात आले आहे. गरजू महिलांना मोफत शिलाई मशीनही दिली जाते. तर प्रशिक्षणादरम्यान महिलांना कापड आणि धाग्याचा कोणताही खर्च उचलावा लागत नाही.

जगदीप धनखड यांचा देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वोच्च स्थानापर्यंत पोहोचण्याचा प्रवास खूपच रंजक आहे. त्यानंतर चितौडगड येथील सैनिक स्कूलमध्ये शिक्षण घेतल्यानंतर, त्यांनी राजस्थानच्या प्रतिष्ठित महाराज कॉलेज, जयपूरमधून पदवी पूर्ण केली आणि भौतिकशास्त्रात बीएसई पदवी मिळवली. त्यानंतर 1978 मध्ये जयपूर विद्यापीठात एलएलबी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. त्यांनी कायद्याची पदवी घेतल्यानंतर सुरुवातील राजस्थान उच्च न्यायालय आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात  वकिली केली.  1988 पर्यंत ते देशातील नामवंत वकिलांपैकी एक बनले. त्यांची राजकीय कारकीर्द सुमारे 30 वर्षांची आहे. 1989 मध्ये ते सक्रिय राजकारणात आले आणि त्याच वर्षी झुंझुनू येथून निवडणूक जिंकून 9व्या लोकसभेसाठी खासदार म्हणून निवडून आले. त्यांनी चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये केंद्रीय संसदीय कामकाज राज्यमंत्री म्हणूनही काम केले आहे. 1993 ते 1998 या काळात अजमेर जिल्ह्यातील किसनगंज विधानसभा मतदारसंघाचेही प्रतिनिधित्व केले. 2019 मध्ये पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून त्यांची नियुक्ती झाली. संसदीय कामकाजाचा दांडगा अनुभव असलेल्या विधीज्ञाची उपराष्ट्रपतीपदी निवड झाली असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले.

या अभिनंदन प्रस्तावावर उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य कपिल पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.