विभाजन विभीषिका दिनामुळे देशाच्या अखंडतेचे महत्त्व समजेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विभाजन विभीषिका दिनामुळे देशाच्या अखंडतेचे महत्त्व समजेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर,१५ऑगस्ट  /प्रतिनिधी :-भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष देशभरात मोठ्या उत्साहात साजरे केले जात असतानाच 75 वर्षापूर्वी देशाच्या विभाजनामुळे झालेल्या वेदनांचे स्मरण ठेवण्यासाठी 14 ऑगस्ट हा दिवस देशात विभाजन विभीषिका दिन म्हणून पाळला जात असून या माध्यमातून देशाच्या अखंडतेचे महत्त्व आपल्याला समजेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.

नागपूर महानगरपालिका, अखिल भारतीय सिंधी समाज व जरीपटका दुकानदार संघाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विभाजन विभीषिका स्मृती दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त भरवण्यात आलेल्या छायाचित्र व माहितीपट प्रदर्शनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते आज येथे झाले. आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार प्रवीण दटके, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी., अतिरिक्त आयुक्त राम जोशी, सिंधी समाजातील मान्यवर उपस्थित होते. फाळणीमुळे घडलेल्या घटनांवर आधारित छायाचित्रांचा समावेश या प्रदर्शनात आहे.

            यावर्षीपासून देशभर 14 ऑगस्ट हा दिवस विभाजन विभीषिका दिन म्हणून पाळला जात आहे. याच दिवशी 75 वर्षांपूर्वी अखंड भारताचे तुकडे झाले. ही वेदना लक्षात घेऊन 14 ऑगस्ट हा दिवस ‘फाळणी वेदना स्मृती दिन’ म्हणून पाळण्यात येत आहे. देशाची फाळणी भयावह ठरली आणि तिच्या परिणामांचे सर्वांना स्मरण राहावे, असे श्री. फडणवीस यांनी सांगितले. देशात फाळणीचे पुन्हा बिजारोपण होणार नाही. यासाठी सर्वांना ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेवर काम करायचे आहे. फाळणीच्या या जखमा खोलवर असूनही स्थलांतरितांच्या मेहनतीचे देशाच्या विकासात मोठे योगदान असल्याचे ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार ‘घरोघरी तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. देशातील प्रत्येक नागरिकांनी राष्ट्रध्वजाचा मान, शान आणि अभिमान ठेवला पाहिजे. या अभियानाच्या यशस्वीतेसाठी प्रत्येकाने घरोघरी तिरंगा फडकविण्याचे आवाहनही श्री. फडणवीस यांनी केले. स्वातंत्र्यासाठी अनेकांनी प्राणांची आहुती दिली. त्यांच्या बलिदानाचे स्मरण करणे प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे. त्यांच्या योगदानाचे मोठे महत्त्व आहे, असे त्यांनी सांगितले.महात्मा गांधी शाळेच्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थिनींच्या हातातील फाळणीसंदर्भातील वेदनांचे वर्णन असलेल्या फलकांनी यावेळी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

विभाजन विभीषिका प्रदर्शनाचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन :फाळणीच्या वेदनांची मांडणी करणारे प्रदर्शन

आजादी का अमृत महोत्सवाच्या निमित्तानेजिल्हा प्रशासन व जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित जिल्हाधिकारी कार्यालयातील विभाजन विभीषिका प्रदर्शनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. हे प्रदर्शन 17 तारखेपर्यंत खुले असून नागरिकांनी कुटुंबासह भेट द्यावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

या प्रदर्शनात भारत पाकिस्तान फाळणीचे सचित्र दर्शन नागरिकांना होणार आहे. धार्मिक आधारावर लार्ड मॉउंडबेटन यांनी केलेल्या फाळणीमुळे जीवनशैली, अस्तित्व यामध्ये अचानक कसे बदल झाले. मानसिकता नसतांना ही फाळणी लादल्या गेली. त्यावेळची नेमकी स्थिती काय होती. 2 जून 1947 प्रत्यक्षात फाळणीला मंजूरी देण्यात आली, या फाळणीमुळे  लोकांच्या मनात भिती व हिंसा यांची एकत्र स्थिती उद्भवली होती, फाळणीमुळे झालेल्या ऐतिहासिक बैठका,याची प्रचिती या प्रदर्शनामुळे आपणाला कळणार आहे. ही माहिती बघणे अंगावर काटा आणते. त्यामुळे हा ऐतिहासिक ऐवज बघण्यासाठी आपल्या मुलांसह कुटुंबाने यावे असेही जिल्हा प्रशासनाने आवाहन केले आहे.

या फाळणीच्या वेळी भारतातून 65 लाख लोक पाकिस्थानात गेले व पाकिस्थानातून 60 लाख भारतात आले. त्यांच्या वेदना व दु:ख या या व्यतिरिक्त अनेक घटनांच्या आठवणी या  प्रदर्शनात पहावयास मिळणार आहे.

हे प्रदर्शन 14 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट यादरम्यान सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत नागरिकांना पाहण्यासाठी नि:शुल्क आहे, प्रदर्शनाला नागरिकांनी एकदा आवश्य भेट दयावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

याठिकाणी प्रांरभी जिल्हा माहिती कार्यालयाने दुर्मिळ लोकराज्याचे प्रदर्शन लावले आहे, सोबत स्वराज्य मोहत्सवांतर्गत नागपूर जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या सचित्र प्रदर्शन लावण्यात आले आहे. निवडणूक विभागातर्फे मतदार कार्डला आधार जोडणी करण्याचा स्टॉलही याठिकाणी आहे. येथे प्रेक्षकांच्या अवलोकनासाठी ठेवण्यात आलेल्या भारतीय संविधानाच्या मूळ प्रतीला बघता येणार आहे. त्यामुळे कुटूंब कबिलासह याठिकाणी आवार्जून भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

आज उपमुख्यमंत्र्यांसोबत विधानपरिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे, आमदार आशिष जयस्वाल, विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी प्रसन्ना-बिदरी, नागपूर महापालिका आयुक्त राधाकृष्न बी., मनरेगा आयुक्त शांतनु गोयल, जिल्हाधिकारी आर. विमला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, तरुण भारतचे संपादक गजानन निमदेव आदी प्रामुख्याने उपस्थित होते.