प्रधानमंत्री स्वनिधी योजनेमुळे फेरीवाल्यांना आधार मिळाला- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने स्वावलंबी पथ विक्रेत्यांचा स्वनिधी महोत्सव उत्साहात

ठाणे, ,२३ जुलै /प्रतिनिधी :-कोरोनाकाळात हातावर पोट असणाऱ्या फेरी विक्रेत्यावर मोठा परिणाम झाला होता. प्रधानमंत्री स्वनिधी योजनेमुळे अशा फेरीवाल्यांना मोठा आधार मिळाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामुळे आशा अनेक लोकांचे संसार वाचले व स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत झाली, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवनिमित्त कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले कलामंदिर येथे कल्याण डोंबिवलीतील पथ विक्रेत्यांसाठी आयोजित स्वावलंबी पथ विक्रेत्यांचा प्रधानमंत्री स्वनिधी महोत्सव प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते.

यावेळी केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील विशेष अतिथी होते. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, नगर परिषद प्रशासनचे उप आयुक्त रोहिदास दोरकुळकर, केंद्र शासनाचे प्रतिनिधी वैभव खानोलकर, माजी महापौर विनिता राणे, माजी नगरसेवक रवी पाटील, प्रेमनाथ म्हात्रे आदी उपस्थित होते. यावेळी स्वनिधी योजनेच्या लाभार्थ्यांचा गौरव, परिचय पत्राचे वाटप करण्यात आले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, सर्वांना सामावून घेणारे, सर्वांचे हित जोपासून विकासाचे स्वप्न साकारण्याचे काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले आहे. स्वनिधी योजनेमुळे फेरीवाले, पथविक्रेते यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम होत आहे. फेरीवाले यांनाही व्यवसाय करण्याचा हक्क आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांना मदत करावी. या बरोबरच नागरिकांना आपल्यामुळे त्रास होणार नाही याची काळजी फेरीवाल्यांनी घ्यावी. पीक विमा योजने प्रमाणेच फेरीवाल्यांना सुद्धा बँकांनी कर्ज उपलब्ध करून घ्यावे, असेही त्यांनी सांगितले.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने स्वनिधी योजनेचे चांगले काम केले आहे. या योजनेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महानगरपालिकेला सर्वतोपरी मदत केली जाईल. नागरिकांनीही शासनाच्या सर्व योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केले.

मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले की, सर्वसामान्याना, सर्व घटकांना न्याय देणारे, त्यांचे हित जोपासणारे हे राज्य शासन आहे. वंचित घटकांना मदत करण्यात येईल. राज्य शासन लवकरच पुढील शंभर दिवसाचा कार्यक्रम तयार करणार आहे.

केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री श्री. पाटील म्हणाले की, कोरोनामुळे रोजगार गेलेल्या सर्वसामान्याचा मदत व्हावी, यासाठी प्रधानमंत्री स्वनिधी योजना सुरू केली आहे. याबरोबरच केंद्र शासनाच्या विविध आठ योजनेमुळे अनेक लोकांना लाभ झाला आहे. सर्वसामान्यांचे जीवन सुरक्षित करण्याचे काम ही विमा योजनेमुळे झाले आहे. विविध योजनांच्या माध्यमातून देशातील गरिबांना मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रधानमंत्र्यांचे उद्दिष्ट आहे. जास्तीजास्त लोकांनी या योजनांचा लाभ घेऊन देशाच्या विकासात हातभार लावावा.प्रास्ताविकात आयुक्त डॉ. दांगडे स्वनिधी योजनेच्या अंमलबजावणीची माहिती दिली.