कृषिमंत्री दादा भुसे यांची पुणतांबा येथील शेतकऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा

उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ७ जून रोजी मुंबई येथे शेतकऱ्यांची बैठक

शिर्डी, ४ जून /प्रतिनिधी :-  तालुक्यातील पुणतांबा येथील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या धरणे आंदोलनातील शेतकऱ्यांची राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी आज भेट घेतली.  किसान क्रांतीच्या कोअर कमिटीबरोबर तीन तास चाललेल्या बैठकीनंतर १५ मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली असून शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ७ जून २०२२ रोजी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक असून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यात येतील. अशा शब्दात कृषिमंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांना यावेळी आश्वस्त केले.

कृषिमंत्र्यांशी शेतकऱ्यांच्या झालेल्या चर्चेनंतर क‍िसान क्रांतीच्या कोअर कम‍िटीने पुणतांबा येथील धरणे आंदोलन २ द‍िवसासाठी स्थग‍ित केले असल्याचे यावेळी जाहीर केले. क‍िसान क्रांतीच्या माध्यमातून पुणतांबा येथील शेतकऱ्यांनी व‍िव‍िध मागण्यांसाठी १ जूनपासून धरणे आंदोलनाला सुरूवात केली आहे. आज आंदोलनाचा ४ था द‍िवस होता. आंदोलनस्थळी स्वत: कृषिमंत्री दादा भुसे यांनी भेट देऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत कोअर कम‍िटीबरोबर चर्चा केली. यावेळी उपमुख्यमंत्री अज‍ित पवार यांच्याशी ही दूरध्वनीवरून शेतकऱ्यांबरोबर चर्चा घडवून आणण्यात आली.  त्यानंतर आयोज‍ित सभेत कृषिमंत्री श्री.भुसे बोलत होते.  याप्रसंगी खासदार सदाश‍िवराव लोखंडे, पुणतांबाचे सरपंच डॉ.धनंजय धनवटे, धनंजय जाधव, सुहास वहाडणे, सुभाष कुलकर्णी, बाळासाहेब चव्हाण, सुभाष वहाडणे, मुरलीधर थोरात, न‍िक‍िता जाधव आदी क‍िसान क्रांतीचे पदाध‍िकारी, शेतकरी व ग्रामस्थ उपस्थ‍ित होते.

कृषिमंत्री दादा भुसे म्हणाले, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील आहेत. त्यांनी दूरध्वनीवर पुणतांबा येथील शेतकऱ्यांच्या मागण्या जाणून घेतल्या आहेत. शेतकऱ्यांच्या १५ वेगवेगळ्या मागण्या आहेत. यातील काही मागण्या कृषी, सहकार व पणन, व‍ित्त, उर्जा, दूग्धव‍िकास, कृषी मूल्य आयोग अशा व‍िव‍िध व‍िभागांशी संबंध‍ित आहेत. तर काही मागण्या केंद्र सरकाराशी संबंधित आहेत. उपमुख्यमंत्री अज‍ित पवार अध्यक्षतेखाली ७ जून २०२२ रोजी मंत्रालयात या सर्व व‍िभागाचे मंत्री, सच‍िव , संबंध‍ित अध‍िकारी व क‍िसान क्रांतीच्या सदस्यांसोबत बैठक घेण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांच्या ह‍िताचे अनेक निर्णय शासनाने यापूर्वीच केले आहेत. महात्मा ज्योत‍िबा फुले कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून  ३२ लाख शेतकऱ्यांना २१ हजार कोटी रूपये शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट वर्ग करण्यात आले आहेत. याच योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात  न‍ियम‍ित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रूपये देण्यात येणार आहेत. यातील पात्र शेतकऱ्यांची यादी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.  डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेच्या माध्यमातून ३ लाख रूपयांचे पीक कर्ज ब‍िनव्याजी देण्यात येत आहे. संपूर्ण राज्यासाठी ड्रीपच्या माध्यमातून ८० टक्के अनुदान देण्यात येत आहे. असे ही कृषिमंत्री श्री.भुसे यांनी सांग‍ितले.

यावेळी शेतकऱ्यांच्या १५ मागण्यांसोबत पीक व‍िमा योजना, शेतकऱ्यांवर मागील आंदोलनाच्या वेळी दाखल गुन्हे मागे घेणे याव‍िषयावर ही चर्चा झाली. कृषीमंत्र्यांशी झालेल्या या सकारात्मक चर्चेनंतर धरणे आंदोलन २ द‍िवसासाठी स्थग‍ित करण्यात येत असल्याची घोषणा कोअर कम‍िटी सदस्यांनी यावेळी केली.