नांदेडच्या प्रवेशद्वारावरील समतेचा विचार जागराचे हे प्रेरणास्थान – पालकमंत्री अशोक चव्हाण

जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे जगदगुरू भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामींच्या हस्ते अनावरण

नांदेडच्या प्रवेशद्वारावरील समतेचा विचार जागराचे हे प्रेरणास्थान – पालकमंत्री अशोक चव्हाण  

लोकार्पण सोहळ्याला दिवाळी सणाचा उत्साह  

नांदेड,२३ एप्रिल  /प्रतिनिधी :- जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर यांनी बाराव्या शतकाच्या कालखंडात सामाजिक समतेचा दिलेला संदेश हा तेवढाच आद्य मानला पाहिजे. त्या कालखंडातील समाजाच्या ज्या धारणा होत्या त्याला सामाजिक न्यायाच्या तत्वावर आणून परिवर्तनशील विचार त्यांनी दिला. समाजासाठी स्वत:ला वाहून घेत समाजाच्या मनपरिवर्तनाचे महान कार्य महात्मा बसवेश्वर यांनी केले आहे. त्यांचे जीवन कार्य संपूर्ण जगाच्या कल्याणाचे आहे. त्यांचा जगाचे सामाजिक नेते असा जर उल्लेख केला तर तो चुकीचा ठरणार नाही. त्यांना मानणारा वर्ग हा व्यापक असण्याचे कारण त्यांनी जपलेले सामाजिक समतेचे तत्व आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे, या शब्दात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या जीवन कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

Image

नांदेड महानगराच्या वैभवात भर टाकणाऱ्या महात्मा बसवेश्वर यांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, आमदार अमर राजूरकर, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, आमदार मोहनअण्णा हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, महापौर जयश्री पावडे, उपमहापौर अब्दुल गफार अ. सत्तार, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मंगाराणी आंबुलगेकर, हरिहरराव भोसीकर, दत्ता पाटील कोकाटे, माजी आमदार ईश्वरराव भोसीकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, माजी आमदार हणमंतराव बेटमोगरेकर, माजी सभापती संजय बेळगे, प्रा. मनोहर धोंडे, किशोर स्वामी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Image

राष्ट्रपुरुषांच्या जीवन कार्याचा विचार समाजापर्यंत पोहचावा यादृष्टीने नांदेड महानगरात आपण निवडक ठिकाणी त्यांचे पुतळे व परिसर सुशोभीकरण केले. महापुरुषांची पुतळे हे समाजाला अव्याहत प्रेरणा देत असतात. त्यांच्या विचाराचा जागर हा सातत्याने समाजापुढे जावा हा उद्देश आपण यापाठीमागे बाळगला आहे, असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. महात्मा बसवेश्वर यांचा अश्वारुढ पुतळा साकारून नांदेड मधील सर्व जनतेच्यावतीने अभिवादन करावे हे माझे स्वप्न होते. ते साकारतांना मधल्या काळात काही अडचणी आल्या. या अडचणींवर मात करून नांदेड महानगरात प्रवेश करतांना प्रवेशद्वारावरच महात्मा बसवेश्वरांच्या या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादाना समवेत ते समतेच्या विचार जागराचे प्रतिक व प्रेरणास्थळ म्हणून याकडे पाहिले जाईल, असा विश्वास पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.

सर्वांच्या प्रयत्नांतून आणि सहकार्यातून आपण हा पुतळा, हे प्रेरणा स्थळ या ठिकाणी आपण उभारू शकलो या धारणेतून मी पाहतो आहे. श्रेयाचा इथे प्रश्न नाही उलट सगळ्याच्या हातभाराचे हे एक प्रतीक आहे. या प्रतिकासाठी माझ्यापरीने जेवढे शक्य आहे तेवढे करण्याचा मी प्रमाणिक प्रयत्न केला, या शब्दात त्यांनी महात्मा बसवेश्वरांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली. आपल्या भाषणात त्यांनी डॉ. शिवलींग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचा आवर्जून उल्लेख करीत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी दिलेल्या जाहीर पाठबळावरच अधिक खंबीरपणे उभे राहता आले.

लिंगायत समाजाच्या प्रश्नांबद्दल मी दक्ष आहे. समाजापुढे असलेल्या अडचणींची मला कल्पना आहे. एक पालक या नात्याने मी जबाबदारी स्विकारायला तयार असून हे प्रश्न मार्गी लावील, असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. आपला जिल्हा हा तेलंगणा, कर्नाटक या राज्याच्या सिमेवरचा आहे. मराठवाडा मुक्तीनंतर आपण विनाअट महाराष्ट्रामध्ये सहभागी झालो. इथल्या सामाजिक प्रश्नांचा पोत हा वेगळा आहे. हा पोत समजून घेतल्या शिवाय त्या-त्या समाजाचे प्रश्न आपल्याला कळणार नाहीत. आपण विनाअट महाराष्ट्रात सामील होऊन येत्या वर्षात 75 वर्षे होत आहेत. हा अमृत महोत्सव मराठवाडा मुक्ती समवेत आपल्या योगदानाचाही आहे, याकडे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी लक्ष वेधले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील समाधान हे माझ्यासाठी जास्त महत्वाचे आहे. याच्यासाठी मी कटिबद्ध आहे. कोणत्याही परिस्थितीत माझे नांदेड मला अधिक सुरक्षित हवे आहे, असे स्पष्ट करून त्यांनी सामाजिक सलोखा व जनतेच्या सुरक्षिततेला अधिक महत्व दिले.

महात्मा बसवेश्वरांनी समतेच्या लढ्यासह “सदाचार हाच खरा धर्म” ही शिकवणूक दिली आहे. ही शिकवणूक आचारणात आणून त्यांचा विचार समाजातील प्रत्येकाने दृढ केला पाहिजे. त्या काळात जाती-धर्माच्या नावावर असलेली अधिक घट्ट पकड लक्षात घेता महात्मा बसवेश्वर यांनी समतेचे जे विचार दिले ते आजही तेवढेच लाख मोलाचे आहेत. सर्वांसोबत व सर्वांना घेऊन चालण्याची शिकवण त्यांनी आपल्याला दिली आहे. लोकशाही मूल्यांची शिकवण यात असल्याचे, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत यांनी सांगितले. यावेळी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, आमदार मोहनराव हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, महापौर जयश्री पावडे, शिवा संघटनेचे संस्थापक मनोहर धोंडे, ईश्वराराव भोसीकर आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी श्री. श्री. श्री. 1008 केदारपीठ जगदगुरू भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांनी आपले आशीर्वाद वचनपर मार्गदर्शन केले.