भय्यू महाराजांच्या आत्महत्येप्रकरणी सेवकासह तिघांना न्यायालयाने दोषी ठरवले

इंदोर:-भय्यू महाराजांच्या आत्महत्येप्रकरणी इंदोर न्यायालयाने आरोपी सेवक, चालक आणि केअर टेकरला दोषी ठरवले आहे. त्यांच्यावर आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. भय्यू महाराज यांनी २०१८ मध्ये स्वतःच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडत आत्महत्या केली होती. त्यानंतर महाराष्ट्रासह देशभरात खळबळ उडाली होती.

इंदोर न्यायालयाने भय्यूजी महाराज आत्महत्येप्रकरणी आरोपींना दोषी ठरवलं असलं तरी अद्याप दोषींना शिक्षा सुनावलेली नाही. त्यामुळे या प्रकरणी न्यायालय काय शिक्षा सुनावते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मागील अनेक वर्षांपासून भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू होती. अखेर इंदोर न्यायालयाने भय्यू महाराजांचा मुख्य सेवक विनायक, केअर टेकर पलक आणि चालक शरदला दोषी ठरवलं आहे. या तिघांनीही भय्यू महाराजांना आत्महत्येला प्रवृत्त केलं असं निरिक्षण न्यायालयाने नोंदवलं. त्यांनी इंदोरमधील आपल्या राहत्या घरात गोळी झाडून आत्महत्या केली होती. सध्या न्यायालयाने पुराव्यांच्या आधारे तिन्ही आरोपींना दोषी घोषित केले आहे. मात्र, या दोषींना काय शिक्षा मिळणार हा निर्णय न्यायालयाने राखून ठेवला आहे.

अध्यात्मिक गुरू भय्यू महाराज यांनी २०१८ मध्ये स्वतःजवळ असलेल्या परवानाधारक पिस्तुलने गोळ्या झाडत आत्महत्या केली होती. सुरुवातीला कौटुंबिक कलह किंवा नैराश्य या दोन कारणांनी आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवण्यात आली. विशेष म्हणजे आत्महत्येपूर्वी काही महिने आधीच त्यांनी सामाजिक आणि आध्यात्मिक कार्यातून आपण आता निवृत्त होत आहोत, असे जाहीर केले होते.

या प्रकरणी इंदूर पोलिसांनी ३ जणांना अटक केलं होतं. यात एका तरुणीचाही समावेश होता. तसेच भय्यू महाराज यांचा सेवक विनायक दुधाळे आणि शरद देशमुख यांना देखील अटक करण्यात आली होती. अटक केलेल्या तरुणीने भय्यू महाराज यांच्याकडून लाखो रुपये उकळले, असा आरोप झाला होता.

गेल्या वर्षी जून महिन्यात भय्यू महाराज यांनी इंदूरमध्ये आत्महत्या केली होती. भय्यू महाराज यांनी राहत्या घरी स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या केली. व्यक्तिगत तणावातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले, असे सांगितले जात होते. आत्महत्येपूर्वी त्यांनी सुसाईड नोटही लिहून ठेवली होती. या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला होता.

देशभरातील विविध राज्यांमधील राजकीय नेते व चित्रपट अभिनेते भय्यू महाराज यांचे अनुयायी होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख व माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील हे त्यांच्याकडे चर्चेसाठी जात असत. महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी त्यांनी मोठे काम केले. मराठवाड्यात त्यांच्या संस्थेने ५०० तलाव खोदले आहेत. वृक्षारोपण चळवळीला त्यांनी मोठी चालना दिली. लोकांकडून ते काहीही भेटवस्तू स्वीकारत नसत. त्याऐवजी एक झाड लावा, असे ते सांगत.